आढावा बैठकीला ग्रामसभेचे स्वरूप
By Admin | Updated: May 18, 2016 00:06 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-18T00:06:16+5:30
आटपाडीत वादावादीचे प्रकार : केवळ चर्चाच; मूलभूत प्रश्नांना बगल

आढावा बैठकीला ग्रामसभेचे स्वरूप
आटपाडी : भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या तालुक्यात खासदार संजय पाटील यांनी टंचाई निवारणाची आढावा बैठक घेतली खरी. पण खासदार पाटील यांच्या या पहिल्या बैठकीची अक्षरश: ग्रामसभा झाली. अधिकाऱ्यांच मनमानी खाबूगिरी यासह राजकारणातून अधिकाऱ्यांचा अन्यायाचा पाढा अनेकांनी अतिशय संतप्त होत मांडला. अनेकवेळा वादावादी झाली. दोन तास बैठक हाऊनही लोकांचे प्रश्न संपले नाहीत आणि बैठकीत एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
खासदार संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवारी) येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सचिन इथापे, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, भारत पाटील उपस्थित होते.
बैठकीस अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. बैठकीत टेंभू योजनेचे पाणी हा कळीचा मुद्दा ठरला. आटपाडी तलावातील पिण्यासाठी आरक्षित केलेले ६२ दशलक्ष घनफुट पाणी पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. एस. पवार यांनी पैसे घेऊन अक्षरश: विकले. त्यामुळे आटपाडीकरांना गाळमिश्रित पाणी प्यावे लागत आहे. यावर वृत्तपत्रांनी वृत्त दिले, तर पवार यांनी त्यांची टिंगल केली.
त्यांना विचारणा केली तर ते आम्ही पाण्याचे मालक आहोत, आमचं पाण्याचं दुकान आहे असे म्हणतात. त्यांनी आम्ही पितो ते पाणी पाणी प्यावे, यासह पवारांवर अशोक लवटे, नौशाद तांबोळी, राजेंद्र खरात यांच्यासह अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केली.
यावर खासदार पाटील म्हणाले, अभियंता पवार यांनी पावसाचे पाणी सोडून दिले. तुमचा राग रास्त आहे. अकांडतांडव करू नका. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलंय. पवार इथं फार दिवस राहणार नाहीत अशी मी व्यवस्था करतो. यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पण विशेष म्हणजे अभियंता पवार हसले! पवार यांच्या निर्लज्जपणावरही अनेकांनी हल्लाबोल केला.
यावेळी सभापती सौ. सुमन देशमुख, भागवत माळी, महिपती पवार, तहसीलदार अजितसिंह पाटील, संजूकुमार सावंत, बळी मोरे, माजी सभापती अलका भोसले, आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, बंडोपंत देशमुख, स्नेहजित पोतदार यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
तलाव भरून घेऊ : ‘टेंभू’ची कामे मार्गी लावू
२०१७ पर्यंत २२ टीएमसी पाणी टेंभू योजनेतून उचलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत नियोजन केले आहे. टेंभू योजनेचा देशातच नव्हे, तर देशाबाहेरही दुष्काळग्रस्तांची योजना असा लौकीक आहे. गेल्या वर्षभरात योजनेची बहुतांशी कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे पाणी आता पुढे सरकू लागले आहे. याचा फायदा घेऊन तालुक्यातील सर्व तलाव टेंभूच्या पाण्याने ३० ते ३५ टक्के भरून घेऊ, असे सांगत टेंभूची उर्वरित कामे २०१७ पर्यंत नक्की पूर्ण होतील, असा आशावाद खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांनी पैसे भरूनही टेंभूचे पाणी देत नाही. पाण्याचे राजकारण करून शेतकऱ्यांचे हाल केले जात आहेत, असा आरोप महिपतराव पवार यांनी केला.