जत पालिकेचा कारभार पंचायतीसारखा
By Admin | Updated: June 17, 2016 23:32 IST2016-06-17T22:59:15+5:302016-06-17T23:32:18+5:30
नागरिकांचा अपेक्षाभंग : अपुरे-अप्रशिक्षित कर्मचारी; शहरातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित

जत पालिकेचा कारभार पंचायतीसारखा
जयवंत आदाटे-- जत --नगरपालिकेची स्थापना होऊन ८ जून २०१६ रोजी चार वर्षे पूर्ण झाली. परंतु येथे अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यरत असल्यामुळे नगरपालिका असूनही कारभार ग्रामपंचायतीसारखा सुरू आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मटण मार्केट, भाजी मार्केट आदी महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. नगराध्यक्ष इकबाल गवंडी व उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधक विकास कामाला राजकीय द्वेषातून विरोध क रत आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामांना खीळ बसत आहे.जत नगरपालिकेक डे सध्या एकूण ४४ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. शासनाकडे आणखी २६ कर्मचाऱ्यांची नव्याने मागणी करण्यात आली आहे. राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या १०१ नगरपालिकांत दोन हजार ७७८ कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामध्ये जत पालिकेचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात नव्याने कर्मचारी भरती होणे अपेक्षित आहे.नगरपालिकेसाठी सुसज्ज इमारत नाही. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या एका छोट्या इमारतीत सध्या कारभार कसा तरी सुरू आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. नगरपालिकेत अपुरी जागा असल्यामुळे विषय समिती सभापती, शाखा अभियंता, विरोधी गटनेते, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा अथवा कक्ष नाही. दोन मोठ्या आरसीसी खोल्यांच्या इमारतीमधून पालिकेचा कारभार केला जात आहे. दैनंदिन कामासाठी नागरिक पालिके त आले, तर त्याना ताटकळत दाटीवाटीने उभे राहून आपले काम करुन घ्यावे लागते आहे. या इमारतीत एकच शौचालय, तेही अरुंद जागेत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी व महिलांसाठी येथे स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जत नगरपालिकेतच स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.
नगरपालिकेत पूर्णवेळ कायम स्वरुपात शाखा अभियंता नाहीत. हंगामी शाखा अभियंता आहेत. त्यांच्याकडून जत शहराच्या विकासात भर घालणारे काम झालेले नाही. गंधर्व ओढापात्राचे सुशोभिकरण करताना त्यांनी मनमानी केली आहे. त्यामुळे नगरसेवक त्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. मुख्याधिकारी म्हणून पंडित पाटील काम पाहत आहेत. त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे एक-दोन दिवस नगरपालिकेत व इतर दिवस ते जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत आहेत. त्याचा विपरित परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.
अग्निशामक दल येथे मंजूर झाले आहे. परंतु त्याची पूर्णता अद्याप झालेली नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास विजापूर, तासगाव, सांगोला येथून अग्निशामक यंत्रणा मागवावी लागते. नगरपालिकेत सत्ताधारी कोण आहेत व विरोधक कोण आहेत, हेच समजून येत नाही. नगरसेवकांसमोर विकास कामांचे आव्हान आहे. येणाऱ्या काही दिवसात त्याची पूर्तता त्यांच्याकडून व्हावी, अशी जत शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. यामुळे शहराच्या विकासाल खीळ बसत असल्याने नागरिकांनी मग नगरपालिके ला सर्व कर तर का भरायचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भम्रनिरास : शहराचा कायापालट नाहीच
जत पालिकेची स्थापना ८ जून २०१२ रोजी झाली. पाच प्रभाग असून नगरसेवकांची संख्या सोळा आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर जत शहराचा कायापालट होईल, संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाईल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग असल्यामुळे ही आशा फोल ठरली आहे. यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असल्याचे नागरिकांची भावना आहे.