महावितरणची सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:45+5:302021-08-26T04:29:45+5:30
विटा : सध्या महावितरण कंपनीने सामान्य वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना वेठीस धरायला सुरुवात केली असून, शेती पंपाच्या मीटरचे रिडिंग ...

महावितरणची सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दादागिरी
विटा : सध्या महावितरण कंपनीने सामान्य वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना वेठीस धरायला सुरुवात केली असून, शेती पंपाच्या मीटरचे रिडिंग घेणाऱ्या एका बड्या कंपनीच्या भाेंगळ कारभाराला क्लीनचिट देत महावितरणने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दादागिरी सुरू केली आहे. महावितरणने हा मनमानी कारभार तात्काळ बंद करावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस ॲड. सुभाष पाटील यांनी दिला आहे.
सुभाष पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची ऐन शेतीच्या हंगामात अडवणूक करण्यासाठीच घाऊक प्रमाणात शेती पंपाची वीज बंद करण्याचा प्रकार सुरू आहे. जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर महिनाभर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पिके पाण्याला आली आहेत. अशावेळी महावितरणने शेती पंपाची वीज तोडून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग सुरू केला आहे.
कोरोनाचा सगळ्यात मोठा दणका शेती व शेतकऱ्यांनाच बसला आहे. त्यातच महावितरण आपल्या चुका झाकून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. गेल्या ६ वर्षांपासून शेती पंपाच्या मीटरचे रिडिंगच घेतलेले नाही. संपूर्ण राज्यातील शेतीपंपाच्या मीटर रिडिंगचा ठेका एका बड्या खासगी कंपनीला दिला आहे. ती कंपनी शेती पंपाच्या मीटरचे रिडिंग घेत नाही; पण वीज वितरण कंपनी मात्र न चुकता कंपनीला कराराचे काेट्यवधी रुपये अदा करत आहे.
शेती पंपाचे अनेक मीटर सध्या बंद आहेत. काही जळलेले आहेत. अनेक मीटर आणि विद्युतपंप यांचा ताळमेळच नाही. तरीही मीटर भाडे चालूच आहे. हा सगळा गोंधळ लपविण्यासाठी सामान्य वीज ग्राहकाला वेठीस धरले जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वीज मंडळाच्या या अन्यायाचा शेतकरी कामगार पक्ष जाहीर निषेध करत आहे. महावितरणने हा गोंधळ तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, असेही सुभाष पाटील म्हणाले.
यावेळी इंद्रजित पाटील, संजय मोरे, जयराम मोरे, सागर पाटील, रणजित पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.