ग्रामपंचायतींकडे महावितरणची १७२ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:21+5:302021-09-25T04:27:21+5:30
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची १७२ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी ग्रामपंचायतींनी चालूचे २६ ...

ग्रामपंचायतींकडे महावितरणची १७२ कोटींची थकबाकी
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची १७२ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी ग्रामपंचायतींनी चालूचे २६ कोटी ३० लक्ष रुपये आठ दिवसात भरावेत, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सद्यस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असून थकबाकी वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम राबविली जाते आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सार्वजनिक पाणी पुरवठ्याची एक हजार २८७ आणि पथदिव्यांची दोन हजार ९३५ वीज कनेक्शन थकबाकीत आहेत. या पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची १४६ कोटी ३० लाख रुपयांची जुनी थकबाकी आहे. तसेच चालूचे वीज बिल २६ कोटी ३० लाख रुपयांचे आहे. थकीत वीज बिलाबाबत शासनाकडून निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायतींनी चालूचे २६ कोटी ३० लाख रुपयांचे वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची चालू वीज देयके स्वनिधीतून भरण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश दिले आहेत. त्या संदर्भातील दिरंगाईस संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, असे शासनाने म्हटले आहे. तरीही ग्रामपंचायतीकडून महावितरणची थकबाकी भरली जात नाही.
या थकबाकी संदर्भात महावितरणने ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना वेळोवेळी सूचना दिली आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून अद्यापही चालू वीज देयके भरणेबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने वीज पुरवठा खंडितची कटू कारवाई होऊ शकते. तरी ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा व पथदिव्यांचे चालू वीज देयकांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.