तासगाव नगरपालिकेत खासदार ऑन फिल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:13+5:302021-02-15T04:24:13+5:30
तासगाव : तासगाव नगरपालिकेत तब्बल चार वर्षांनंतर खासदार संजयकाका पाटील यांनी पदाधिकाऱ्यांत खांदेपालट केली. उपनगराध्यक्ष आणि पक्षप्रतोद पद बदलल्यानंतर ...

तासगाव नगरपालिकेत खासदार ऑन फिल्ड
तासगाव : तासगाव नगरपालिकेत तब्बल चार वर्षांनंतर खासदार संजयकाका पाटील यांनी पदाधिकाऱ्यांत खांदेपालट केली. उपनगराध्यक्ष आणि पक्षप्रतोद पद बदलल्यानंतर खासदार संजयकाका पाटील स्वत: ऑन फिल्ड असून पालिकेतील विकासकामांच्या आढाव्यापासून ते प्रलंबित कामांच्या निपटाऱ्यांपर्यंत लगबग सुरू केली आहे. लवकरच प्रभागनिहाय आढावा बैठका होणार आहेत.
तासगाव नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष पदामुळे नगराध्यक्षपदाची संगीत खुर्ची झाली नाही. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाच्या संगीत खुर्चीलाही ब्रेक मिळाला होता. तब्बल चार वर्षांनंतर उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय रेंदाळकर, तर पक्षप्रतोद म्हणून जाफर मुजावर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर खासदार संजयकाका पाटील यांनी पालिकेच्या कारभारवर लक्ष केंद्रित केले आहे. पंधरा दिवसांत तीनवेळा अधिकारी, पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी, मंजूर विकासकामांना गती देण्यासाठी खासदार पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
खासदारांच्या आढावा बैठकांबरोबरच नव्या पदाधिकाऱ्यांनीही पालिकेच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. उपनगराध्यक्ष रेंदाळकर आणि पक्षप्रतोद मुजावर यांनी पालिकेत ठाण मांडून कामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. शहरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
लवकरच खासदार संजयकाका पाटील शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय विकासकामांचा आढावा घेणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
शहरात सत्ताधाऱ्यांची सुरू असलेली लगबग पाहता संभाव्य पालिका निवडणुकीला मैदानात उतरण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.
चौकट
नव्या पदाधिकाऱ्यांवर भिस्त
तासगाव नगरपालिकेचा गेल्या चार वर्षांतील कारभार अनेक कारणांनी चर्चेत राहिला. स्वच्छता ठेक्यांपासून ते पालिकेतील ठेकेदारीपर्यंत अनेक कारणांनी पालिकेचा कारभार काळवंडला होता. नव्या कारभाऱ्यांनी पालिकेत ठाण मांडून कामाला सुरुवात केली असली तरी रखडलेल्या कामांचा प्रश्न मार्गी लावून आश्वासनपूर्ती करण्याची भिस्त नव्या पदाधिकाऱ्यांवर आहे.