आमदार मोहनराव कदम वाढदिवस लेख (२)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:32+5:302021-06-16T04:35:32+5:30
तत्त्वनिष्ठ राजकारणी प्रताप महाडिक, कडेगाव कडेगाव तालुक्यातील सोनसळ या गावातील एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने ...

आमदार मोहनराव कदम वाढदिवस लेख (२)
तत्त्वनिष्ठ राजकारणी
प्रताप महाडिक, कडेगाव
कडेगाव तालुक्यातील सोनसळ या गावातील एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने जिल्ह्याच्या राजकारणात जम बसविला. सांगली जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी १९७२मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजवर राजकारणातील तत्वनिष्ठ नेता म्हणून नावलौकिक मिळवला तो आजवर मिळविलेल्या सत्ता आणि पदांपेक्षा श्रेष्ठ आहे.
पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून ज्या काही मोजक्या नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडविली, त्यात आमदार मोहनराव कदम यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. राजकारणातील बारकावे त्यांनी जिल्हा परिषदेत आत्मसात केले. १९७२ ते १९९७ अशी तब्बल २५ वर्षे त्यांनी जिल्हा परिषदेत काम केले. तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही दीर्घकाळ काम केले. २०१६च्या विधानपरिषद निवडणुकीत सांगली - सातारा विधानपरिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ऐतिहासिक विजय मिळवत त्यांनी विधानपरिषदेत प्रवेश केला.
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या संघर्षमयी राजकीय जीवन प्रवासात मोहनराव कदम दादांचेही मोलाचे योगदान आहे. १९८५मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवून डॉ. पतंगराव कदम आमदार झाले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, असे मोहनराव कदम नेहमीच सांगतात. १९९५ला राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले. याच काळात ते सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळी काँग्रेसला सांगली जिल्ह्यात मोहनराव कदम दादांनी नवसंजीवनी दिली. १९९९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून वेगळे होत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मोहनराव कदम दादा आणि आमदार डॉ. पतंगराव कदम हे दोन्ही बंधू राष्ट्रवादीत गेले नाहीत.
काँग्रेसनिष्ठ मोहनराव कदम दादांच्या प्रतिमेचा फायदा जिल्हा काँग्रेसला झाला. आघाडी सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्री आणि दादा स्वतः जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते, तरीही दादांनी कधी मोठेपण आणि बडेजाव मिरविला नाही. दीर्घकाळ सत्तेच्या राजकारणात असूनही कधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. स्वतःच्या फायद्यासाठी साखर कारखाना, शिक्षण संस्था, सूतगिरण्या, दूध संघाचा वापर केला नाही. या संस्था आदर्शवत चालविण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. राजकारणात जनता जनार्दन हेच त्यांचे सर्वस्व होत. त्या जोरावरच त्यांनी राजकारणात यश मिळविले. त्यामुळेच विधानपरिषद निवडणुकीत विरोधकांनीही त्यांच्याबाबत सहानुभूती व आपुलकी दाखविली. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.
कडेगाव पलूस तालुक्यात गावोगावी रस्ते, पाणी आदी योजना मार्गी लावल्या. सत्तेसाठी ते झुकले नाहीत आणि तत्त्वाशी तडजोड केली नाही. दादा हे सर्वसामान्य व कष्टकऱ्यांचे नेते आहेत. साधेपणा व सर्वमान्य जनता हीच त्यांची राजकारणातील कमाई आहे.
या जोरावरच त्यांनी सांगली जिल्ह्यातील बड्या बड्या नेत्यांना शह दिला. दर निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना घेरले. परंतु, दादांनी नेहमीच आत्मविश्वासाने झुंज दिली, यात कधी यश, तर अपयश आले. पण, दादा डगमगले नाहीत. सध्याच्या राजकारणात दुर्मीळ असणारा साधेपणा दादांच्या अंगी आहे. साधेपणा व सच्चाई जोपासणारा नेता म्हणून परिचित असणारे दादा नेहमीच गोरगरीब जनतेच्या दुःखात सहभागी असतात. नव्या पिढीतील राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.