आमदार बाबर गट आटपाडी तालुक्यात ‘फार्मात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:24+5:302021-01-20T04:27:24+5:30
अविनाश बाड आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व मोठ्या गावांतील ग्रामपंचायतींवर आमदार अनिल बाबर यांच्या गटाने याआधी भगवा फडकविला आहे. ...

आमदार बाबर गट आटपाडी तालुक्यात ‘फार्मात’
अविनाश बाड
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व मोठ्या गावांतील ग्रामपंचायतींवर आमदार अनिल बाबर यांच्या गटाने याआधी भगवा फडकविला आहे. आता घरनिकी आणि शेटफळे या मोठ्या ग्रामपंचायतीही ताब्यात घेतल्यानेेेे आमदार बाबर यांचा गट आटपाडी तालुक्यात ‘फार्मात’ आला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर असलेला वचक आणि पूर्णवेळ राजकारणाला लोकांनी पसंती दिल्याचेे या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील आटपाडीसह दिघंची, खरसुंडी, करगणी या ग्रामपंचायती यापूर्वी आमदार अनिल बाबर यांच्या ताब्यात आहेत. आताच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची झालेल्या शेटफळेची निवडणूक लक्षवेधी ठरली. आधी बिनविरोधसाठी मोठी चर्चा झालेल्या या गावात नंतर निवडणुकीने रंग भरला. या ग्रामपंचायतीवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटाचे अनेक वर्षे प्राबल्य होते. मात्र, यावेळी प्रथमच बाबर यांच्या ताब्यात गेली आहे. देशमुख गटामध्ये या गावात अनेक नेते तयार झाले आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. कुरघोडीच्या राजकारणाने त्यांना पराभव पत्करावा लागला.
लेंगरेवाडी, तळेवाडी आणि धावडवाडी या ग्रामपंचायतीही शिवसेनेने ताब्यात घेतल्या आहेत, तर विठ्ठलापूर, माडगुळे आणि देशमुखवाडी या ग्रामपंचायतींवर देशमुख गटाने विजय मिळविला आहे. बाबर यांच्यासह त्यांचे काही कार्यकर्ते सदैव लोकांच्या कामांसाठी उपलब्ध होत आहेत. अगदी रुग्णवाहिका मिळवून देण्यापासून ते कोणत्याही कामासाठी लोक थेट आमदारांना फोन करीत आहेत. त्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोक या गटाला पसंत करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. तळेवाडी, लेंगरेवाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत बाबर गटातील कार्यकर्त्यांनी युती केली होती. पडळकर सध्या राज्यभर चर्चेत असतात; पण या निवडणुकीत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला नसल्याचे दिसून आले. देशमुख गटामध्ये विविध संस्थांमध्ये नोकरी असलेल्या कार्यकर्त्यांचा अधिक भरणा आहे. शिवाय राजेंद्रअण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख संस्थात्मक कामात सतत व्यस्त असतात. राजेंद्रअण्णांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख आणि अमरसिंह देशमुख यांचे पुत्र दिग्विजय देशमुख ही नवी पिढी अनेक इव्हेंट करून तरुण पिढीत उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसते; पण प्रशासकीय कामांमध्ये लोकांना मदत करण्यात काही ठिकाणी त्यांना मर्यादा येत असल्याने लोक बाबर गटाकडे वळत आहेत.
चौकट
नाद करा; पण आमचा कुठं?
विठ्ठलापूरला बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी दोन पॅनल उभे केले. तिथे ३३ उमेदवार रिंगणात होते. त्यांच्या मतांमध्ये विभागणी झाल्याने पराभव झाला. देशमुख गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून ‘आमचा नाद करू नका’ असा संदेश दिला. माडगुळे येथेही देशमुख गटाने एकहाती सत्ता ताब्यात घेतली. याही गावांत मतदारांना गृहीत धरल्याने बाबर गटाचा मतदारांनी धुव्वा उडविला.