मिरज पश्चिममध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सगळे एकत्र
By Admin | Updated: September 13, 2016 00:50 IST2016-09-13T00:05:03+5:302016-09-13T00:50:47+5:30
जिल्हा परिषद निवडणुका : मोर्चेबांधणीला वेग; काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील स्थानिक नेत्यांची भूमिका निर्णायक

मिरज पश्चिममध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सगळे एकत्र
सोमनाथ डवरी -कसबे डिग्रज --मिरज पश्चिम भाग इस्लामपूर मतदार संघाला जोडल्यापासून दोन विधानसभा निवडणुका झाल्या, पण या भागात जिल्हा परिषद निवडणुकीत अद्यापही माजी मंत्री जयंत पाटील यांना एकहाती सत्ता मिळालेली नाही. यंदा सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदामुळे ‘स्वाभिमानी’चे वजन वाढले आहे. त्यातच कॉँग्रेस, शिवसेनेसह सगळ्यांनीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अंतिमक्षणी जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विरोधक एकत्रित येण्याची चिन्हे आहेत.
गतवेळी कसबे डिग्रज मतदार संघात जिल्हा परिषदेची जागा कॉँग्रेसला आणि पंचायत समितीची जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. कवठेपिरान मतदार संघात भीमराव माने यांच्यामुळे राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. गेल्या पाच वर्षात मोठे बदल झाले आहेत. राज्यात सरकार बदलले आहे आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा जोरही ओसरला आहे. भाजपपेक्षा स्वाभिमानीचा जोर सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदाने वाढला आहे. त्याचप्रमाणे भीमराव माने शिवसेनेत गेल्याने कवठेपिरान परिसरात शिवसेना जोमात आहे, तर कॉँग्रेसमधील मदनभाऊ पाटील गट आणि विशाल पाटील गट एकत्र येतील, अशी स्थिती आहे.
सद्यस्थितीत पश्चिम भागात राष्ट्रवादीने कितीही एकसंधता दाखवली तरी, चित्र वेगळे आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. परिसरात कॉँग्रेस-स्वाभिमानीची आघाडी होण्याची चिन्हे आहेत. कारण पूर्वाश्रमीचे कॉँग्रेसजनच ‘स्वाभिमानी’चे काम करताना दिसत आहेत.
निवडणुकीत तालुका-जिल्हा पातळीवर काम करणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव नलवडे, श्रीपाल चौगुले, राष्ट्रवादीचे अजयसिंह चव्हाण, मोहनराव देशमुख, कुमार लोंढे, शिवसेनेचे भीमराव माने, राष्ट्रवादीचे वैभव पाटील (समडोळी), रवींद्र माणगावे (सावळवाडी), अरुण साळुंखे, विलास आवटी (दुधगाव), भास्कर पाटील (तुंग), तसेच वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक सचिन डांगे, स्वाभिमानीचे कुमार पाटील (मौजे डिग्रज) या स्थानिक नेत्यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत.
एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या गटात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आरक्षण कोणते असणार आणि उमेदवार कोण याची चर्चा सुरु आहे.