मिरज पंचायत समिती सभेत सेस निधीसाठी सदस्यांची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:39+5:302021-03-04T04:50:39+5:30
ओळ : मिरज पंचायत समितीच्या सभेत सेस निधीच्या मागणीसाठी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मिरज : सेस फंड थकल्याने ...

मिरज पंचायत समिती सभेत सेस निधीसाठी सदस्यांची घोषणाबाजी
ओळ : मिरज पंचायत समितीच्या सभेत सेस निधीच्या मागणीसाठी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मिरज : सेस फंड थकल्याने आक्रमक झालेल्या सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांसमोर हक्काचा निधी मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. पंचायत समितीला मिळालेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा व निधी खर्चाबाबत उदासीनता असल्याचा आरोप करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत पार पडली. तालुक्यात महसूल वाढला असताना या उत्पन्नावर आधारित पंचायत समिती सदस्यांना मिळणारा सेस निधी तीन वर्षांपासून मिळालेला नाही. हक्काचा निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी अशोक मोहिते यांनी सभेस उपस्थित मुख्य लेखाधिकारी महेश औताडे यांच्याकडे केली. यावेळी किरण बंडगर, विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, दिलीपकुमार पाटील, सतीश कोरे यांच्यासह महिला सदस्यांनी घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.
जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाल्यानंतर सेसची रक्कम मिळेल, असे औताडे यांनी सांगितले. पंधराव्या वित्त आयाेगाचा सुमारे एक कोटीहून अधिक निधी पंचायत समितीला मिळाला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सदस्यांना विकासकामांसाठी निधी मिळाला नाही, याचा जाब विक्रम पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला. कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत समन्वय नसल्याबाबत अशोक मोहिते, विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, कृष्णदेव कांबळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सदस्यांचा कालावधी संपल्यावर निधी उपलब्ध करणार काय, असा जाबही सदस्यांनी विचारला. उपसभापती अनिल आमटवणे यांनी हस्तक्षेप करीत पंधराव्या वित्तच्या निधी खर्चाचे तातडीने नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने वादावर पडदा पडला. एलईडी बल्ब खरेदी घोटाळ्यातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप दिलीपकुमार पाटील यांनी केला.
चौकट
म्हैसाळचे आवर्तन सुरू करा : विक्रम पाटील
कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने शासन निर्णयाप्रमाणे शेती व घरगुती वीज पुरवठा खंडित करू नये, तालुक्यात शेतीचा व पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर होत असल्याने शासनाने तातडीने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी विक्रम पाटील यांनी केली.
चौकट
निकृष्ट रस्त्यांच्या चौकशीसाठी समिती
तालुक्यात सार्वजनिक बांधकामचे अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची हाेत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. संबंधित कामाच्या चौकशीसाठी सदस्य व अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात येईल, असे उपसभापती अनिल आमटवणे यांनी सांगितले. रस्त्याच्या निकृ़ष्ट कामाबाबत आतापर्यंत झालेले ठराव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याची सूचनाही आमटवणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केली.