चमत्कारांचा दरबार उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 00:59 IST2016-05-23T00:38:19+5:302016-05-23T00:59:26+5:30

सांगलीत ‘अंनिस’कडून भांडाफोड : भोंदूूबुवा बनलेल्या दोन सख्ख्या भावांना अटक

Miracle drove | चमत्कारांचा दरबार उद्ध्वस्त

चमत्कारांचा दरबार उद्ध्वस्त

सांगली : सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी येथे चमत्कारांचा दरबार भरवून लोकांची फसवणूक करणाऱ्या वडील व दोन मुलांच्या त्रिकुटाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रविवारी दुपारी भांडाफोड केला. विश्रामबाग पोलिसांच्या मदतीने छापा टाकून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा बोगस दरबार उद्ध्वस्त केला. स्वत:च देवाचा अवतार समजून हा दरबार भरविणाऱ्या सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे.
परशुराम आनंदा नाईक (वय ३०) व त्रिज्योत आनंदा नाईक (२८, दोघे रा. नाना पाटील कॉलनी, वानलेसवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील परशुराम हा स्वत:ला बाळूमामांचा अवतार समजत होता. तो संगणक अभियंता आहे. त्याचे वडील आनंदा नाना नाईक (६२) हेही त्यांना भोंदूगिरीत मदत करीत होते, पण अंनिसची केवळ नाईक बंधूंविरुद्ध तक्रार होती. त्यामुळे वडिलांवर अटकेची कारवाई करण्यात आली नाही. अटकेतील नाईक बंधंूविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना उद्या (सोमवार) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. याप्रकरणी अंनिसच्या कार्यकर्त्या राणी कदम यांनी फिर्याद दिली आहे.
नाईक बंधूंनी वानलेसवाडीतील ढेरे मळ्यात चमत्कारांचा वारसा चालविणारा दरबार भरविला होता. यासाठी भव्य मंडप उभा केला होता. भंडाऱ्याने करणी, लागीर, भूतबाधा काढण्यापासून ते जीवनातील सर्व समस्या सोडविण्याच्या भूलथापा मारुन ते लोकांची फसवणूक करीत होते. याबाबत अंनिसकडे तक्रार आल्यानंतर डॉ. प्रदीप पाटील, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, प्रियांका तूपलोंढे, जावेद पेंढारी व राणी कदम यांनी थेट दरबारात उपस्थिती लावली. राणी कदम यांनी ‘नोकरी मिळत नाही, पैसा जवळ रहात नाही, घरी सतत वाद होतात’, अशा समस्या मांडल्या. त्यावेळी गादीवर बसलेल्या परशुराम नाईक याने त्यांना आत बोलावून घेतले. ‘तुमच्यावर करणी झाली आहे, असे म्हणत राणी कदम यांच्या तोंडात भंडारा भरला. त्यानंतर डोक्यास पकडून भंडाऱ्यात चेहरा बुडविला. मान पकडून ‘पंचामृत’ पाजून गळा दाबला’. ‘कोकणाची विठलाई समस्या सोडवेल’, असे सांगितले. त्यानंतर अंनिसने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल करुन परशुराम नाईक व त्याच्या भावाला रविवारी पकडले. (प्रतिनिध

अभियंता बनला महाराज
परशुराम नाईक हा संगणक अभियंता आहे. काही महिन्यांपूर्वी बाळूूमामांच्या अवताराचा साक्षात्कार झाल्याचे त्याने सांगितले. त्याने वडील व भावाच्या मदतीने हा दरबार सुरु केला होता. परशुरामच्या दरबाराची एवढी ख्याती झाली की, बाहेरील जिल्ह्यात, तसेच कर्नाटकातही त्याचे भक्त तयार झाले. ते अनेक समस्या घेऊन त्याच्याकडे येत असत.
प्रत्येक भक्ताचे नाव रजिस्टरमध्ये नोंदविले जात असे. भक्तांना आदल्यादिवशी नंबर लावण्यास सांगितले जायचे. प्रत्येक रविवारी पहाटे चार वाजता दरबार सुरू व्हायचा. त्रिज्योत नाईक हा ध्वनिक्षेपकावरुन नाव पुकारुन एकावेळी पाच भक्तांना परशुरामच्या दरबारात प्रवेश द्यायचा. तसेच त्याचे वडील आनंदा हे कीर्तन करुन धार्मिक वातावरण निर्माण करीत होते.

सहा महिन्यांत १३ भोंदूबुवांना पकडले
सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील भोंदूबुवांचा भांडाफोड करण्यात अंनिसची एक्स्प्रेस सुसाट सुरु आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी १३ भोंदूबुवांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रविवारी पकडलेला परशुराम नाईक हा १३ वा बुवा निघाला. अजूनही काही बुवा त्यांच्या रडारवर आहेत; ‘स्टिंग आॅपरेशन’ करुन त्यांना लवकरच पकडले जाईल, असे प्रदीप पाटील यांनी सांगितले.

पालिकेच्या जागेवर दरबार
परशुराम नाईक याने महापालिकेच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण करुन हा दरबार सुरु केला होता. पालिकेने त्याला केवळ नोटीस बजावण्याशिवाय काहीच केले नाही. पालिकेने हा भूखंड ताब्यात घेऊन तो सार्वजनिक कार्यासाठी खुला करावा, अशी मागणी डॉ. प्रदीप पाटील यांनी केली आहे.

Web Title: Miracle drove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.