स्मारक जाळपोळ; चौघांना कोठडी
By Admin | Updated: June 15, 2014 00:22 IST2014-06-15T00:20:04+5:302014-06-15T00:22:02+5:30
संशयितांना शुक्रवारी उगारखुर्द (ता. अथणी) येथे अटक

स्मारक जाळपोळ; चौघांना कोठडी
सांगली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या स्मारकात जाळपोळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या आठवड्यात जाळपोळीची ही घटना घडली होती. संशयितांना शुक्रवारी उगारखुर्द (ता. अथणी) येथे अटक केली होती.
नीतेश व्हराळे, अमनदीप कांबळे, किरण बेळकुंडे, प्रीतम जयकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. फेसबुकवर राष्ट्रपुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर संशयितांनी कोल्हापूर रस्त्यावर जाऊन एसटी बसवर दगडफेक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एवढ्या रात्री तिकडे कशाला जायचे, असा विचार करुन त्यांनी सावरकरांच्या स्मारकात जाळपोळ करण्याचा ठरविले. त्यानुसार सोमवारी रात्री त्यांनी जाळपोळ केली होती. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह दुर्मिळ ग्रंथ-पुस्तके, सावरकरांचे वैचारिक वाड्मय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रचार पुस्तके अशी दीड हजारावर ग्रंथसंपदा जळून खाक होऊन दोन लाखांचे नुकसान झाले होते. अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या या प्रकरणाचा छडा लावण्याचे शहर पोलिसांसमोर आव्हान होते; मात्र बसवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मारुती व्हराळे याच्या चौकशीतून स्मारक जाळपोळीचे धागेदोरे मिळाले आणि चार संशयितांना अटक करण्यात यश आले होते. त्यांना आज (शनिवार) दुपारी पोलीस बंदोबस्तात न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १७ जूनपर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी सुनावली. सायंकाळी त्यांची सांगलीच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)