स्मारक जाळपोळ; चौघांना अटक
By Admin | Updated: June 14, 2014 01:35 IST2014-06-14T01:29:14+5:302014-06-14T01:35:06+5:30
खोडसाळपणाने स्मारकात जाळपोळ केल्याची कबुली

स्मारक जाळपोळ; चौघांना अटक
सांगली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतील स्मारकात जाळपोळ केल्याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना आज, शुक्रवारी दुपारी यश आले. उगारखुर्द (ता. अथणी, जि. बेळगाव) येथे चौघांना पकडण्यात आले. येथील गावभागातील अमरधाम स्मशानभूमीजवळ चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. संशयितांनी खोडसाळपणाने स्मारकात जाळपोळ केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्यांमध्ये नितेश दिलीप व्हराळे (वय २२), अमनदीप राजेंद्र कांबळे (२५, दोघे रा. सिद्धार्थ परिसर गावभाग, सांगली), किरण पंडित बेळकुंडे (२२, हरिपूर रस्ता) व प्रितम दिनकर जयकर (२२, शंभरफुटी रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना उद्या, शनिवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. व्हराळे कोल्हापुरात पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीस आहेत. कांबळे एका व्यापाऱ्याच्या वाहनावर चालक आहे. बेळकुंडे महापालिकेतील सफाई कामगार आहे, तर जयकर शंभरफुटी रस्त्यावरील वाहन दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये काम करतो. चौघेही जीवलग मित्र आहेत. रात्री जेवण केल्यानंतर ते दररोज अमरधाम स्मशानभूमीजवळील कट्ट्यावर गप्पा मारत बसतात. चार दिवसांपूर्वी (सोमवार) रात्री ते गप्पा मारत बसले होते. त्यांच्यात फेसबुकवर राष्ट्रपुरुषांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचा विषय निघाला. त्यावेळी जयकरने आपणही या घटनेचा निषेध करण्यासाठी एसटी बस फोडल्या पाहिजेत. यासाठी कोल्हापूर रस्त्यावर जाऊया, असे सुचविले. त्यावेळी अन्य तिघांनी एवढ्या लांब कशाला जवळच असलेल्या बाबाराव स्मारकात जाळपोळ करू, असे सांगितले. चौघांचे एकमत झाल्यानंतर साडेअकराला ते स्मारकाबाहेर जाऊन बसले. साडेबाराला दरवाजाचे कुलूप तोडून आत गेले. सुरुवातीला स्मारकाच्या सभागृहातील सोफासेट पेटविला. त्यानंतर पुस्तकांची खोली पेटवून दिली. या जाळपोळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दुर्मीळ छायाचित्रांसह दुर्मीळ ग्रंथ-पुस्तके, सावरकरांचे वैचारिक वाङ्मय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रचार पुस्तके अशी दीड हजारांवर गं्रथसंपदा जळून खाक होऊन दोन लाखांचे नुकसान झाले होते. या घटनेचा बाबाराव सावरकर स्मारक विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना व संघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीसप्रमुख सावंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी कसून तपास करून अवघ्या चार दिवसांत याचा छडा लावत चार संशयितांना अटक केली.
काल सकाळी एसटी बसवर दगडफेक केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. यामध्ये मारुती विश्वास व्हराळे (रा. सांगलीवाडी) यास अटक केली होती. स्मारकात जाळपोळप्रकरणी अटक केलेला नीतेश व्हराळे हा त्याचा चुलत भाऊ आहे. मारुतीकडे जाळपोळ प्रकरणातील सहभागाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने आपल्या भावासह त्याच्या मित्रांनी हे कृत्य केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चौघांचा शोध घेतला. मात्र, घटनेपासून ते गायब होते. ते उगार खुर्द येथे आश्रयास असल्याची माहिती मिळाली. एक पथक तिकडे तातडीने रवाना केले. चौघांना आज, गुरुवारी दुपारी अटक केली.
नुकसान वसूल करणार : सावंत
सावंत म्हणाले की, स्मारकातील जाळपोळीत दोन लाखांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान त्यांच्याकडून वसूल करावे याचे कलम त्यांच्याविरुद्ध लावले आहे. त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. जिल्ह्यात एसटीवर दगडफेकप्रकरणी अटक केलेल्या संशयितांविरुद्धही अशीच कारवाई केली जाणार आहे.
आगपेटीने जाळपोळ
सावंत म्हणाले की, संशयितांनी जाळपोळ करण्यासाठी कापडी बोळे, रॉकेल, पेट्रोल, डिझेल यापैकी कशाचाही वापर केला नाही. केवळ आगपेटीने ही सर्व जाळपोळ केली आहे. साडेबारा ते दीड असे एक तास ते स्मारकात जाळपोळ करीत होते. त्यांच्याविरुद्ध आता भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी