महाराष्ट्राचे प्रभावशाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:47+5:302021-02-16T04:28:47+5:30

शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील एक उमदे व प्रभावशाली, तरुण, अफाट महत्त्वकांक्षा सामावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जयंत ...

Maharashtra's influential ... | महाराष्ट्राचे प्रभावशाली...

महाराष्ट्राचे प्रभावशाली...

शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील एक उमदे व प्रभावशाली, तरुण, अफाट महत्त्वकांक्षा सामावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जयंत पाटील. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय व सहकार क्षेत्राच्या क्षितिजावरील आदरणीय व्यक्तिमत्त्व, सहकारमहर्षी राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव. संयमी, हुशार व तितकेच मिश्कील जयंतराव पाटीलसाहेबांचा जन्म मुळातच लोकसेवा व जनसेवेसाठी झाला. बापूंनी जे कार्य उभे केले, ते ताकदीने सांभाळताना लोकनेता म्हणून असलेल्या बापूंच्या ओळखीला कुठेही धक्का लागणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. बापूंच्या कार्याचा वारसा चालविताना सर्वसामान्यांना समोर ठेवून, त्यांनी सुख-दु:खे जाणून घेत आपली माणसं जाेडत युवा वयातच त्यांनी लोकचळवळ उभी केली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिक यांना बापूंची कमतरता जराही भासू न देता जयंतराव पाटील युवावयातच सर्वसामान्यांचे नेते झाले. त्यानंतर त्यांनी आजवर कधीही मागे वळून पाहिले नाही. एवढे मोठे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रातील जनता त्यांच्या रूपाने आज अभिमानाने पहात आहे.

सामान्य माणूस हा जयंतराव पाटील यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. आजवर आदरणीय बापूंनी उभ्या केलेल्या सहकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, समाजसेवी, क्रीडा आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या संस्था आज जयंतराव पाटीलसाहेबांच्या नेतृत्वाने बहरल्या आणि विस्तारल्या आहेत.

जयंतराव पाटील स्वत: उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या उच्चशिक्षणाचा उपयोग महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या कामकाजात वेळोवेळी दिसून आला आहे. राज्याचा अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री पद त्यांनी उत्तम सांभाळले. नऊ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून महाराष्ट्र राज्य आर्थिक विकासात अग्रेसर ठेवले. आता जलसंपदा विभागाची मोठी जबाबदारी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे.

मुळातच कर्मवीरांच्या व क्रांतिकारकांच्या भूमीतून जी नवरत्ने जन्माला आली. त्या महान नेत्यांची विचारधारा जपणारा नेता तसेच आदरणीय पवारसाहेबांचा विश्वासू सहकारी म्हणून जयंतराव पाटील यांची ओळख आहे. दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा नेता, कार्यकर्त्यांना सांभाळत पक्ष संघटना मजबूत करणारा नेता म्हणून त्यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी लीलया पेलली आहे.

जयंत पाटील यांचा प्रत्येक गुण या मातीच्या गुणातून विकसित झाला आहे. आजच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय साधून विरोधकांना मिश्कीलपणे चिमटे काढीत वातावरणात हास्य पसरविणारे नेते ही त्यांची आणखी एक मोठी ओळख... आपले पाय कायम जमिनीवर ठेवून मातीतील माणसांना जोडणारे नेते म्हणजे जयंतराव पाटील. कोणतेही क्षेत्र असो, समोरच्या माणसाला आनंद देणारे नेते म्हणून तळागाळातील तरुणाई, शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांना जयंतराव पाटील यांचे नेतृत्व भावले आहे. आगामी कालखंडात त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याची संधी मिळो, या सदिच्छा।।

- शशिकांत शिंदे. आमदार

प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Maharashtra's influential ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.