महादेव जानकारांचा शेतकऱ्याच्या बांधावरून थेट कृषिमंत्र्यांना फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:47+5:302021-09-21T04:28:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले माजी मंत्री महादेव जानकर यांनी शेटफळे येथील मररोगाने अडचणीत आलेल्या ...

महादेव जानकारांचा शेतकऱ्याच्या बांधावरून थेट कृषिमंत्र्यांना फोन
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले माजी मंत्री महादेव जानकर यांनी शेटफळे येथील मररोगाने अडचणीत आलेल्या डाळींब बागायतदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली. या वेळी त्यांनी थेट राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना फोन करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या वेळी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दोन तासांत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना शेतात जाऊन पाहणी करेल, अशी ग्वाही देत जानकर यांच्या मागणीला प्रतिसाद दिला.
शेटफळेतील ब्रम्हदेव गायकवाड त्यांच्या घरी स्नेहभोजनानिमित्ताने महादेव जानकर आले होते. या वेळी गायकवाड यांचे चुलते चंद्रकांत विनायक गायकवाड यांनी त्यांच्या डाळींब बागेची विदारक अवस्था जानकर याच्यापुढे मांडली. जानकर यांनी त्यांच्या शेतामध्ये जाऊन डाळींब बागेची पाहणी केली. तेथील परिस्थिती पाहून जानकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना फोनवरुन माहिती दिली. गायकवाड यांना गेल्या दोन वर्षांपासून पीक विमा मिळाला नाही. शिवाय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाईही मिळाली नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी जानकर यांनी केली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी चंद्रकांत गायकवाड याचा मोबाईलनंबर घेत दोन तासांत जिल्हा कृषी अधिकारी आपल्याशी संपर्क साधेल, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, याबाबत तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की चंद्रकांत गायकवाड यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असून त्यांनी पीक विमा व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे सांगितले आहे. तालुक्यातील नऊ गावांतील तीन कोटी २४ लाख रुपये नुकसानभरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. अद्याप निधी उपलब्ध झाला नाही.