अडत्यांच्या मनमानीने गुऱ्हाळांची हानी
By Admin | Updated: November 24, 2015 00:22 IST2015-11-24T00:15:13+5:302015-11-24T00:22:39+5:30
व्यापाऱ्यांकडूनही अडवणूक : गूळ उत्पादकांची सातत्याने पिळवणूक--गुऱ्हाळघरांना घरघर-२

अडत्यांच्या मनमानीने गुऱ्हाळांची हानी
सहदेव खोत -- पुनवत---सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ उद्योगाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या हानीला बाजारपेठेतील अडते व गूळ व्यापारी यांची मनमानी कारणीभूत ठरू लागली आहे. जिवाचे रान करून तयार केलेला गूळ बाजारपेठेत घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला दरातच चिरडले जात असल्यामुळे, या शेतकऱ्यांची आर्थिक हानी होऊ लागली आहे आणि हेच गुऱ्हाळ उद्योगाच्या ऱ्हासाचे कारण ठरत आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उत्पादकांना कोल्हापूर, कऱ्हाड व सांगली अशा बाजारपेठा उपलब्ध आहेत. या तीनही बाजारपेठांमध्ये शेकडो अडत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. वास्तविक गूळ उत्पादक व व्यापारी यांच्यामधील दुवा म्हणजे हा अडत दुकानदार. मात्र सद्यस्थितीत गूळ उत्पादक शेतकऱ्यांची चिंता ना या अडत्यांना आहे, ना व्यापाऱ्यांना. गूळ उत्पादकांची या दोघांकडून सातत्याने पिळवणूक होत आहे.गुऱ्हाळघरात जिवाचा आटापिटा तयार केलेला गूळ, चांगला दर मिळेल या आशेवर शेतकरी या अडत्यांच्या पेढीवर पाठवतात. शेतकऱ्याने गुळाची दहा कलमे पाठविली, तर एखाद्याच कलमाला मध्यम ते काहीसा चांगला दर मिळतो. उर्वरित कलमे नीचांकी भावानेच जातात. अडत्यांकडून गूळ खरेदीदार वाट्टेल त्या भावाने गूळ खरेदी करतात. बहुतांशी गुळाचे सौदे हे शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीतच चालतात. त्यामुळे आपल्या गुळाचा काय दर झाला, हे त्या शेतकऱ्याला दुसऱ्याकडूनच समजते. त्यामुळे मिळेल तो दर घेऊन गप्प बसण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर गत्यंतर नसल्याचे दिसून येत आहे.
अडते-वाहतूकदार : एक ‘अर्थ’पूर्ण कनेक्शन
एकच वाहतूकदार अनेक गुऱ्हाळघरांतील गूळ बाजारपेठेत पोहोचवतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजारपेठ पाहिलेलीच नसते. आपल्याच दुकानात गूळ मिळविण्यासाठी अडत दुकानदार व वाहतूकदार यांच्यात एक ‘अर्थ’पूर्ण कनेक्शन असते. यामध्ये बिचारा शेतकरी मात्र यापासून दूरच राहतो व बऱ्याचवेळा चांगल्या दराला मुकतो.
दरातील फरकामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया
एकंदरीत, गूळ व्यापारी व अडत्यांना या शेतकऱ्यांच्या कष्टाची अजिबात माहिती नसते. त्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. दरात फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात आहे. वास्तविक गूळ उत्पादक टिकला तरच आपला व्यवसाय चालेला, याचा अडते व गूळ व्यापाऱ्यांना विसर पडत चालल्याने, या उद्योगात ‘गूळ व्यापारी मालामाल व शेतकरी कंगाल’ असेच चित्र निर्माण झाले आहे.