टाळेबंदीमुळे उद्योगांची कच्च्या मालाची पुरवठा साखळी खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:43+5:302021-04-12T04:23:43+5:30
उद्योजकांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. यावेळी रमेश आरवाडे, शरद नलवडे, नाना ...

टाळेबंदीमुळे उद्योगांची कच्च्या मालाची पुरवठा साखळी खंडित
उद्योजकांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. यावेळी रमेश आरवाडे, शरद नलवडे, नाना कांबळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लाॅकडाऊनमध्ये बाजारपेठा बंद झाल्याने उद्योगांचा कच्च्या मालाचा पुरवठा बंद झाला आहे. कारखाने सुरु, पण उत्पादन नाही, अशी विचित्र कोंडी झाली आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठादारांना व्यवसायाला परवानगीची मागणी उद्योजकांनी केली आहे. भाजपच्या उद्योग आघाडीतर्फे आमदार सुधीर गाडगीळ, शरद नलवडे, रमेश आरवाडे व नाना कांबळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
उद्योजकांनी सांगितले की, बाजारपेठांसाठीची सरकारची नियमावली उद्योजक व व्यापाऱ्यांची सत्वपरीक्षा पाहणारी ठरत आहे. कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे, कामगारांनाही प्रवासाला आडकाठी नाही, पण कारखान्यांना कच्चा माल मिळत नाही, अशी विचित्र स्थिती आहे. जिल्ह्यातील कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू तसेच कोल्हापूर येथून होतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदीने कच्चा माल पुरवणाऱ्या एजन्सी बंद आहेत. कारखान्यांतील उत्पादनांसाठी हार्डवेअर, विद्युत उपकरणे, ऑईल, यंत्रांचे सुटे भाग, हत्यारे यांचा पुरवठा थांबला आहे.
उद्योजकांनी सांगितले की, या पुरवठादारांसाठीचे निर्बंधसुध्दा उद्योगांना अनुकूल असावेत. पुरवठासाखळी खंडित होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. हे व्यवसाय आणि उद्योग परस्परांवर अवलंबून असल्याची दखल न घेताच शासनाने सरसकट टाळेबंदी जाहीर केली. उद्योग सुरु ठेवण्यास सांगताना पुरवठासाखळी मात्र बंद ठेवली. कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीकडे कानाडोळा केला. सरकारच्या धोरणांमुळे उद्योग व व्यवसाय मोडकळीस येणार आहे.
कारखान्यांतील सर्रास मजूर परप्रांतीय आहेत. व्यवसाय बंद झाल्यास त्यांची उपासमार होईल. ते गावाकडे निघून गेल्यास पुन्हा परतणार नाहीत. त्यामुळे उद्योगांसाठी सरकारचे धोरण जीवघेणे ठरत आहे.
चौकट
एमआयडीसीत लसीकरण सुरु करा
उद्योजकांनी मागणी केली, अैाद्योगिक वसाहतीत कामगारांसाठी कोरोनाचे लसीकरण उपलब्ध करुन द्यावे. उद्योग सुरु असल्याने मोठ्या संख्येने कामगार वसाहतीत येत आहेत. त्यांच्यासाठी प्रशासनाने एकत्रित लसीकरणाची सोय करावी.