साहित्य हे सर्वाधिक सशक्त माध्यम

By Admin | Updated: December 26, 2016 23:03 IST2016-12-26T23:03:36+5:302016-12-26T23:03:36+5:30

भास्कर चंदनशिव : बेळंकीमध्ये तिसरे इरादा ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

Literature is the most powerful medium | साहित्य हे सर्वाधिक सशक्त माध्यम

साहित्य हे सर्वाधिक सशक्त माध्यम

सांगली : माणसामधील माणुसकीची जाणीव करून देण्याची ताकद साहित्यात असते. आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या वेदना, भोग मांडण्यासाठी साहित्याइतके सशक्त माध्यम कोणतेही नाही. त्यामुळे साहित्य हे वेदनेतूनच साकारते. जगावे कसे आणि वागावे कसे हे माणसाला सांगण्याचे काम साहित्यातून होत असल्याने, सुसंस्कारित समाजाच्या निर्मितीसाठी साहित्याची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी रविवारी केले.
बेळंकी (ता. मिरज) येथील इरादा सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या इरादा ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून चंदनशिव बोलत होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, विधानभवनातील मुख्य माहिती व संशोधन अधिकारी बा. बा. वाघमारे व ज्येष्ठ नाट्यकर्मी राजेंद्र पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंदनशिव पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे साहित्य माणसाला जगणे शिकविते, अगदी त्याप्रमाणेच साहित्य माणसाला शहाणपण शिकविते, जगण्याच्या माध्यमाची जाणीवही करून देते. त्या-त्या भागातील वेदना प्रभावीपणे मांडण्यात साहित्य आपली भूमिका पार पाडतच आहे. साहित्याच्या जाणिवा जिवंत राहाव्यात यासाठी प्रत्येकानेच आपल्यात बदल करणे आवश्यक आहे. आपल्या राज्याचा विचार केला, तर राज्य विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे विभागले गेले आहे. मात्र, साहित्यात इतकी ताकद आहे की, ते कुठेही विभागले गेलेले नाही.
स्वागताध्यक्ष बा. बा. वाघमारे, राजेंद्र पोळ यांनीही मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘रंग नात्याचे... साहित्याच्या कुंचल्यातून’ या विषयावरील परिसंवादात बोलताना, नात्यांतील पैलू काही करूनही सापडत नसल्याने नाटकासारख्या माध्यमातून हे मांडताना कसोटीचा क्षण असतो. त्यामुळे निनावी नातेच अधिक भावत असल्याचे प्रतिपादन इरफान मुजावर यांनी केले. तसेच कथा, कादंबरी आणि कवितांतून मांडल्या जाणाऱ्या नातेसंबंधावर अत्यंत प्रभावीपणे साहित्यिका डॉ. स्वाती शिंदे-पवार यांनी आपले मत मांडले.
संमेलनाचे संयोजन ‘इरादा’चे रवींद्र कुंभार, मदन जाधव, नागेश गायकवाड, अजित कुंडले, शरद गायकवाड, माधुरी माळी यांच्यासह ‘इरादा’च्या सदस्यांनी केले. (प्रतिनिधी)


वैविध्यपूर्ण सत्रामुळे : संमेलनात रंगत
अ‍ॅड. योगेश मोरे यांनी ‘सशक्त आणि समृध्द समाज उभारणीत युवकांचे योगदान’ यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी ‘माझे जीवन, माझा संघर्ष’ या विषयावर मार्गदर्शन केले. लता ऐवळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. त्यात रमजान मुल्ला, विकास चव्हाण, सचिन माळी, चंद्रकांत देशमुखे, चंद्रकांत वेल्हाळ, प्रतिभा जगदाळे, अभिजित पाटील यांनी कविता सादर केल्या. शांतिनाथ मांगले यांचे कथाकथनही झाले. समारोप कार्यक्रमाला कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिनेता दिग्विजय रोहिदासचा सक्सेस पासवर्ड
संमेलनात चित्रपट अभिनेता दिग्विजय रोहिदास याची मुलाखत रवींद्र कुंभार यांनी घेतली. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ विचार न करता, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा, यश तुमचेच असेल, असा यशाचा कानमंत्रच त्याने यावेळी दिला.

बेळंकी (ता. मिरज) येथे आयोजित इरादा साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चित्रपट अभिनेते दिग्विजय रोहिदास, ज्येष्ठ नाट्यकर्मी राजेंद्र पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Literature is the most powerful medium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.