...अखेर सांगली जिल्हा झाला टँकरमुक्त
By Admin | Updated: August 31, 2014 23:48 IST2014-08-31T22:44:17+5:302014-08-31T23:48:39+5:30
पाणीसाठाही वाढला : सलग दोन वर्षाच्या दुष्काळानंतर मिळाला दिलासा-लोकमत विशेष

...अखेर सांगली जिल्हा झाला टँकरमुक्त
अंजर अथणीकर -सांगली -सलग दोन वर्षे दुष्काळाच्या छायेखाली असणाऱ्या सांगली जिल्ह्याला आॅगस्टमधील पावसाने मात्र दिलासा मिळाला आहे. दोन वर्षापासून सांगली जिल्ह्यात सुरु असलेले सर्व टँकर पहिल्यांदाच बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठाही आता ४० टक्क्याच्या वर गेला आहे.
जुलै उजाडला तरी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जुलैमध्ये जिल्ह्यातील टँकरची संख्या तीसवर होती. जुलैनंतर चांगला पाऊस सुरु झाला. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली होती. तलावांतील पाणीसाठा संपून विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला होता. चांदोली, कोयना या धरणांमध्ये पाणीसाठा वीस टक्क्याच्या खाली गेला होता. आॅगस्टमध्ये झालेल्या दिलासादायक पावसामुळे दुष्काळ हटला आहे.
वारणा धरण शंभर टक्के भरले
जिल्ह्यातील वारणा धरण आता शंभर टक्के भरले आहे. धरणामध्ये ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात ९६.१२ टीएमसी, धोममध्ये १२.४३ व कण्हेरमध्ये ९.८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना ९१.३२, धोम ९२.११ व कण्हेर धरण ९७.०४ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील तलावांमध्ये आता ७५ टक्क्यापर्यंत पाणीसाठा झाला आहे.
दोन कोटीचा खर्च
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तसेच मिरज तालुक्यात यावर्षीही टँकर सुरु करण्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा चारा छावण्या सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती. जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात आॅगस्टमध्ये सरासरीच्या तुुलनेत १५२.२ टक्के इतका पाऊस झाला आहे. सरासरीमध्ये हा पाऊस ४५२.४ मि.मी. इतका आहे. विशेष म्हणजे हा पाऊस सर्वच तालुक्यात आहे. सांगली जिल्ह्यातील पाणीसाठाही ४० टक्क्याहून अधिक वाढला आहे. यामुळे ३० आॅगस्टपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी जत तालुक्यात दोन व कवठेमहांकाळ तालुक्यात १ टँकर सुरु होता. उन्हाळ्यात १६२ टॅँकर सुरु करण्यात आले होते. सुमारे दोन कोटीहून अधिक रुपये टँकरवर खर्च करण्यात आले होते.