गेल्यावर्षी म्हणत होते, येऊ नको, आता म्हणतात, ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:43+5:302021-05-27T04:29:43+5:30

कोकरुड : ‘तू गावी येऊ नको. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल. गावात आले की, पंधरा दिवस शाळेत ठेवतात,’ असे परगावी ...

Last year they were saying, don't come, now they say, come ... | गेल्यावर्षी म्हणत होते, येऊ नको, आता म्हणतात, ये...

गेल्यावर्षी म्हणत होते, येऊ नको, आता म्हणतात, ये...

कोकरुड : ‘तू गावी येऊ नको. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल. गावात आले की, पंधरा दिवस शाळेत ठेवतात,’ असे परगावी असणाऱ्यांना निरोप देणारे नातेवाईक आता म्हणतात, ‘घरी लग्न कार्य आहे. त्यातच पेरणीचीही लगबग सुरू असल्याने गावी ये’, पण मात्र मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे यासारख्या मोठ्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून, गावाकडे संख्या वाढतच चालली असल्याने पाठ फिरवणाऱ्यांची संख्या खूप आहे.

गेल्यावर्षी आलेल्या कोरोना साथीने जवळचे कोण आणि लांबचे कोण, हे दाखवून दिले. गेल्यावर्षी ‘गावी येऊ नको’ असे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र सांगत होते. ‘तू गावी कोरोना घेऊन येशील. आलास तर गावातील शाळा, मंदिर, सभागृहात पंधरा दिवस कालावधी होईपर्यंत ठेवावे लागेल. आजारी पडलास तर सांगलीला घेऊन जातील. तू येऊच नकोस’, असे म्हणत होते. विलगीकरण कालावधी संपला तरी लोक दुरुनच बोलत होते.

मात्र यावर्षी शिराळा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या गेल्यावर्षीच्या तिप्पट झाली आहे. पण कोरोना आजार नाही, असेच लोक वागत आहेत. भीती कमी झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर असलेल्या लोकांना साखरपुडा, लग्न, वास्तुशांती, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांना बोलावू लागले आहेत. काहीजण शेतीच्या कामाचे निमित्त सांगून बोलावत आहेत. मात्र मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे यासारख्या मोठ्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून, गावाकडे संख्या वाढतच चालली असल्याने पाठ फिरवणाऱ्यांची संख्या खूप आहे.

गेल्यावर्षी नोकरी गेलेले, व्यवसाय बंद पडलेले, आर्थिक अडचणीत आलेले सर्वजण ‘आम्ही इकडे बरे आहोत. तुम्ही काळजी घेऊन कामे करा’, असे म्हणत येण्याचे टाळत आहेत.

शिराळा तालुक्यात गेल्यावर्षी पन्नास हजारापेक्षा जास्त लोक गावी येऊनही रुग्ण संख्या मर्यादित होती. यावर्षी जवळपास दहा हजाराच्यादरम्यान लोक गावी आले. त्यातील बहुतांश परत निघूनही गेले. मात्र ग्रामीण भागातील रुग्ण संख्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे गाव नको शहर बरे म्हणण्याची वेळ आली आहे.

Web Title: Last year they were saying, don't come, now they say, come ...