रस्ता रुंदीकरणात पन्नासहून अधिक वटवृक्षांवर कुऱ्हाड
By Admin | Updated: June 12, 2014 00:49 IST2014-06-12T00:48:43+5:302014-06-12T00:49:21+5:30
सावली जाणार : चिरंतन नात्यासाठी पूजल्या जाणाऱ्या वडाच्या झाडावर संक्रांत; नव्याने वटवृक्षांच्या लागवडीची मागणी

रस्ता रुंदीकरणात पन्नासहून अधिक वटवृक्षांवर कुऱ्हाड
शीतल पाटील ल्ल सांगली
प्रचंड आकार असणाऱ्या, दाट सावली देणाऱ्या आणि दीर्घायुष्य असलेल्या वटवृक्षावरच आता संक्रांत येऊ लागली आहे. शहरातील रस्ता रुंदीकरणात सुमारे ५० हून अधिक वडाची झाडे तोडली गेली आहेत. आणखी तोडली जाणार आहेत. एक-दोन पिढ्यांच्या वाटचालीचे आणि अनेक घटनांचे साक्षीदार असलेले वटवृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
वटवृक्षाचे महत्त्व केवळ वटपौर्णिमेलाच आहे असे नाही. शहर असो अथवा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी वडाची डेरेदार झाडे गावाची शोभा वाढवित असतात. उन्हाळा, पावसाळ्यात नागरिकांवर प्रेमाची सावली टाकत असतात. वटपौर्णिमेला तर वडाच्या झाडाला मोठे महत्त्व असते. हे झाड पुरातन काळापासून पूजनीय मानले जात आहे. या दिवशी सुवासिनी वडाची पूजा करतात. चिरंतन संसार आणि सातजन्मीच्या बंधनासाठी याच वृक्षाला साक्षीदार मानून पूजले जाते. भावनांचे धागे या वृक्षाशी बांधले जात असतानाच प्रगतीच्या पावलांनी त्याच्यावर संक्रांतही आणली जात आहे. दळणवळणाच्या साधनांवर शहरांच्या प्रगतीचा आलेख मांडला जात आहे. नागरी सुविधांच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका पोहोचत आहे.
सांगली शहर आणि आजूबाजूच्या परिसरात झाडांची संख्या प्रचंड आहे. अनेक वर्षांच्या दळणवळणाचे साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पण काळाच्या ओघात रस्त्यांच्या रुंदीकरणाची गरज ओळखून काही प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे झाडावर संक्रांत आली आहे. त्यात वटवृक्षांचाही समावेश आहे. सांगली-कोल्हापूर रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर २० हून अधिक वडाची झाडे होती. त्यातील बहुतांश झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे.
सांगली-मिरज रस्त्यावरील पुष्पराज चौक ते विश्रामबाग या रस्त्याच्या रुंदीकरणात २ वडाची झाडे येतात. ती तोडण्याची परवानगी महापालिका व वृक्ष प्राधिकरणाने दिली आहे. माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर ते जकात नाका या रस्त्यावरही २५ वडाची झाडे आहेत. हे वटवृक्ष तोडण्यास वन विभागाने परवानगी दिली आहे. अद्याप महापालिकेची परवानगी मिळालेली नाही. त्यात रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने अजूनही नागरिक, वाहनधारकांच्या पाठीशी सावलीप्रमाणे हे वटवृक्ष उभे असल्याचे दिसत आहे.