पोषण आहारासाठी किडके कडधान्य
By Admin | Updated: December 21, 2014 00:42 IST2014-12-21T00:40:43+5:302014-12-21T00:42:36+5:30
मिरज तालुक्यातील प्रकार : संतप्त पालकांची ठेकेदारावर कारवाईची मागणी

पोषण आहारासाठी किडके कडधान्य
अण्णा खोत ल्ल मालगाव
मिरज तालुक्यात प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत किडलेल्या व सडलेल्या हरभऱ्याचा पुरवठा करण्यात आल्याने पालक संतप्त झाले आहेत. निकृष्ट कडधान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचा ठेका रद्द करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी व पालकांतून होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी दूरदृष्टी ठेवून केंद्र शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात आली आहे. मध्यान्ह भोजन म्हणून ओळखली जाणारी ही योजना अधिकाऱ्यांचा अशीर्वाद व पुरवठादार ठेकेदाराच्या स्वार्थी वृत्तीने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर घाला घालणारी ठरू लागली आहे. शालेय पोषण आहारासाठी तांदूळ, तेल, चटणीसह मसाले पदार्थ व कडधान्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. भातात दरदिवशी वाटाणा, तुरडाळीबरोबर हरभरा हे वेगवेगळी कडधान्ये वापरली जातात. दहा दिवसांपूर्वी प्राथमिक शाळांमध्ये हरभरा पुरवठा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भोजनात वापरण्यात येणारा हा हरभरा पाहून पालक संतप्त झाले. किडलेल्या व सडलेल्या हरभऱ्याचा पुरवठा करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचा हरभरा वापरण्यास शालेय शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. शालेय पोषण आहाराच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारी करूनही निकृष्ट वस्तूंचा पुरवठा सुरूच आहे.
शालेय पोषण आहार नियंत्रणासाठी पंचायत समितीमध्ये स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन पोषण आहाराच्या वस्तूंचा दर्जा तपासला जात नाही. मुख्याध्यापकांकडून येणाऱ्या अहवालावर कार्यालयात बसूनच माहिती गोळा करण्याचे काम अधिकारी पार पाडत असल्याची तक्रार आहे. हरभऱ्या बरोबर वाटाणा, तेल, चटणी, कडधान्यासह दर्जाहीन वस्तूंचा पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांना बेचव व निकृष्ट आहार निमुटपणे घ्यावा लागत आहे. परिणामी त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची भीती पालकांतून व्यक्त होत आहे. निकृष्ट कडधान्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी पालकवर्गातून मागणी होत आहे.