कासेगाव, परिसरातील ठेवीदारांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:52+5:302021-04-12T04:23:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील नेहमी शुकशुकाट असलेल्या यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या शाखेत वर्दळ वाढली आहे. ...

कासेगाव, परिसरातील ठेवीदारांचे धाबे दणाणले
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील नेहमी शुकशुकाट असलेल्या यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या शाखेत वर्दळ वाढली आहे. तसेच वाळवे तालुक्यातील सर्वच शाखांमध्ये ठेवीदारांनी धाव घेतली आहे. सध्या या ठिकाणी फक्त शिपाई कार्यरत असल्याने ठेवीला कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, रेठरे हरणाक्ष दाैऱ्यावर असताना डॉ. इंद्रजित मोहिते यांची गाडी अडवून ठेवीदारांनी त्यांना ठेवींच्या रकमेबद्दल जाब विचारला.
कासेगाव येथील संतोष पाटील यांच्यासह चार जणांनी यशवंतराव मोहिते पतसंस्थेत अंदाजे २० लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. गेले दीड वर्षापासून या ठेवी परत मिळाव्यात यासाठी रेठरे बु. येथे असलेल्या मुख्य कार्यालयात ते खेटे घालत आहेत. संस्थापक डॉ. इंद्रजित मोहिते यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. शाखेमध्ये शिपायाव्यतिरिक्त एकही अधिकारी-कर्मचारी भेटत नाही. अशीच अवस्था वाळवे तालुक्यातील सर्व शाखांमध्ये आहे. दरम्यान, शनिवार, दि. १० रोजी कासेगाव (ता. वाळवा) येथील पतसंस्थेच्या शाखेत २५ हून अधिक ठेवीदारांनी धाव घेतली. तेथे फक्त शिपाई होता, अशी माहिती मिळते. कासेगाव परिसरातील नागरिकांच्या दोन ते अडीच कोटींच्या ठेवी अडकल्याने या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, कृष्णेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. इंद्रजित मोहिते हे रेठरे हरणाक्ष येथे गेले होते. यावेळी येथील ठेवीदारांनी त्यांची गाडी अडवून आपल्या गुंतवलेल्या रकमेबद्दल जाब विचारला. या गावातील शाखेत अंदाजे दीड कोटीच्या ठेवी असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठेवीबद्दल मोहिते यांनी तुमच्या स्थानिक संचालकांनी घेतलेले कर्ज भरले नाही. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि जाब विचारा, असे सांगत ठेवीची जबाबदारी निश्चितपणे आपण घेऊ, असे आश्वासन दिले.
चौकट
डॉ. इंद्रजित मोहिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले की गेले पंधरा वर्षे मी संचालक बोर्डात नाही. वडिलांच्या नावाने संस्था आहे म्हणूनच याची जबाबदारी घेत आहे. कृष्णा साखर कारखान्याचे सर्व व्यवहार या संस्थेच्या माध्यमातून चालत होते. त्यावेळी संस्था भक्कम होती. कर्जाची हमी कारखाना घेत होता. आता सत्ताधारी संचालकांनी हात झटकले आहेत. त्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.
फोटो : ११ इस्लामपुर १..२..३
ओळी : रेठरे हरणाक्ष (ता वाळवा) येथील ठेवीदारांनी डॉ इंद्रजित मोहिते यांनी गाडी अडवली. त्यांनी बेनेटवर बसून उत्तरे दिली.