‘एमआयएम’बाबत जयंतरावांचे मौन
By Admin | Updated: November 24, 2015 00:23 IST2015-11-24T00:18:28+5:302015-11-24T00:23:41+5:30
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम : इस्लामपुरात वैयक्तिक हेव्यादाव्याचे राजकारण पेटले

‘एमआयएम’बाबत जयंतरावांचे मौन
अशोक पाटील -- इस्लामपूर शहरात राजारामबापू आणि जयंत पाटील यांच्या कृपाछत्राखाली वावरलेल्या तांबोळी घराण्यातील शाकीर तांबोळी यांनी एमआयएमच्या झेंड्याखाली पालिकेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना आव्हान दिले आहे. तांबोळी यांनी पाटील यांची कारस्थाने चव्हाट्यावर आणण्याची भाषा सुरू केली आहे. मात्र त्यामुळे राष्ट्रवादीची बदनामी होत असून, यावर माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी मौन पाळले आहे. या प्रकारावरून वैयक्तिक हेव्यादाव्याचे राजकारण पेटल्याची चर्चा आहे.इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात विरोधकांची भूमिका नेहमीच कुचकामी ठरली आहे. विरोधी पक्षनेते विजय कुंभार, नगरसेवक आनंदराव पवार, कपिल ओसवाल यांच्या भूमिका ठाम नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. भाजपच्या बाबासाहेब सूर्यवंशी आणि विक्रमभाऊ पाटील यांच्यात सख्य नसल्याचेही अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधकांचा विरोध सत्ताधाऱ्यांपुढे नगण्य ठरला आहे. त्यातच आता शाकीर तांबोळी यांनी एमआयएमच्या झेंड्याखाली थेट पालिकेतील सत्ताधाऱ्यांनाच आव्हान दिले आहे. मात्र हे त्यांचे आव्हान फक्त विजयभाऊ पाटील यांच्यापुरते वैयक्तिक पातळीवर असल्याचे बोलले जात आहे.
एमआयएमचे जिल्हाध्यक्षपद मिळविण्यासाठी तांबोळी यांनी मिरजेतील एका बड्या नेत्याचा आधार घेतल्याची चर्चा आहे. हेच मिरजेतील नेते तांबोळी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा डाव आखत आहेत. तांबोळी यांनी दलितांचा आधार घेत आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभिकरणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु या प्रश्नावर बहुतांशी दलित नेत्यांनी आंदोलन छेडले आहे. तांबोळी यांनी मिरज येथील ‘भाडोत्री’ दलित नेते आणून डॉ. आंबेडकर यांच्याबाबत खोटा कळवळा दाखवल्याची चर्चाही राष्ट्रवादीतून आहे. विजयभाऊ पाटील यांनी पालिकेच्या राजकारणात स्वत:च्या अस्तित्वासाठी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर कडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वत:चे मित्र अशोकदादा पाटील यांना जवळ करून राजकारणातून हद्दपार केले. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनाही भाऊंसह त्यांच्या समर्थकांनी टार्गेट केले आहे. पालिकेच्या राजकारणात जे जे आडवे येतील, त्यांना त्यांनी अलगद बाजूला केले आहे. त्यामुळे तांबोळी यांच्या वक्तव्याची त्यांनी दखल घेतलेली नाही.
...तरीही विजयभाऊ टार्गेट
इस्लामपूर शहराचा राजकीय इतिहास पाहता, पालिकेवर एम. डी. पवार यांनी २५ वर्षे सत्ता गाजवली. त्यानंतर उरुण परिसरातीलच जुन्या पाटील पार्टीने नागरिक संघटनेच्या छताखाली एकत्र येऊन पवार यांना आव्हान देत त्यांची सत्ता उलथवून टाकली. राजारामबापू पाटील ते जयंत पाटील यांना मानणाऱ्या समर्थकांनी सत्तेचे जाळे वर्षानुवर्षे घट्ट करुन ठेवले. या कारकीर्दीत हिंदू—मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या शहरात कधीही जातीय तेढ निर्माण झाले नाही. जयंत पाटील यांनी मुस्लिम नेत्यांना अनेकवेळा नगरपालिकेवर काम करण्याची संधी दिली. परंतु पाटील यांचे पूर्वी समर्थक असलेले शाकीर तांबोळी यांनी आता एमआयएमच्या माध्यमातून पालिकेचे कारभारी असलेल्या पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना टार्गेट केल्याने, शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष : केवळ नावापुरतेच
इस्लामपूर शहराला विविध पक्षांचे जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. बाबासाहेब सूर्यवंशी (भाजप), चंद्रकांत खराडे (मनसे), आनंदराव पवार (शिवसेना), शाकीर तांबोळी (एमआयएम) यांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे इस्लामपूर शहरातील या जिल्हाध्यक्षांकडून एकही उल्लेखनीय काम झालेले नाही.
मी पालिकेच्या राजकारणात गेल्या ३0 वर्षांपासून राजकारण करीत आहे. आतापर्यंत किती आले किती गेले, मी कधीही डगमगलो नाही. अनेकांनी माझ्यावर आरोप केले. त्यांना वेळोवेळी त्यांची जागा दाखवून दिली आहे. तांबोळी यांचा माझा कसलाही परिचय नाही. त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. त्यांना मी जमेत धरत नाही.
- विजयभाऊ पाटील,
पक्षप्रतोद
पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना वैयक्तिक टार्गेट करुन शाकीर तांबोळी मोठे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. विजय पाटील पालिकेचे पक्षप्रतोद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. पत्रकबाजी करण्यापेक्षा त्यांनी आपण जे बोलत आहोत, ते कृतीत आणून दाखवावे.
- सुभाष सूर्यवंशी,
नगराध्यक्ष