जयंतरावांचे ‘पिक्चर अभी बाकी है!
By Admin | Updated: December 21, 2014 00:42 IST2014-12-21T00:40:07+5:302014-12-21T00:42:48+5:30
नवा राजकीय डाव : महापालिका बरखास्तीच्या मागणीतून मदनभाऊंवर निशाणा

जयंतरावांचे ‘पिक्चर अभी बाकी है!
अविनाश कोळी ल्ल सांगली
वसंतदादा घराण्याविरोधातील संघर्षाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीतच पूर्णविराम न देता जयंत पाटील यांनी ‘पिक्चर अभी बाकी है’ असा संदेश देत महापालिका बरखास्तीची मागणी केली. मदन पाटील यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष त्यांनी यापुढेही चालूच राहील, याचे संकेत दिल्याने सांगलीच्या राजकीय मैदानात आता पुन्हा हा सामना रंगणार आहे.
सात वर्षांपूर्वी जयंतरावांनी सांगलीत वसंतदादा घराण्याच्या संघर्षाचा नारळ फोडला. २00८ मधील महापालिका निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेला संभाजी पवारांच्या माध्यमातून त्यांनी मदन पाटील यांना धोबीपछाड दिला. पुन्हा २0१३ च्या महापालिका निवडणुकीत मदन पाटील यांनी गत पराभवाची सव्याज परतफेड केल्याने जयंतरावांनी संघर्षाची धार अधिक तीव्र केली. लगेचच लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रतीक पाटील यांच्या पराभवासाठी ‘फिल्डिंग’ लावली. त्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर लगेचच २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत मदन पाटील यांच्याशी उघड संघर्ष त्यांनी सुरू केला. मदन पाटील यांचा पराभव म्हणजे काळ््या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा उल्लेख त्यांनी केला. दादांच्या वारसदारांनी संस्थात्मक वाट कशी लावली, याचे उल्लेख भाषणांमध्ये करून त्यांनी छुप्या संघर्षाला मैदानी स्वरुप दिले. प्रतीक पाटील आणि मदन पाटील यांच्या पराभवानंतर जयंतराव या राजकीय संघर्षाला पूर्णविराम देतील, असे अनेकांना वाटले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.
जयंतरावांनी अधिवेशनात गॅस्ट्रोच्या साथीवरून महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली. मदन पाटील यांना घायाळ करण्यासाठीच त्यांनी महापालिकेवर निशाणा साधला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत रामराज्य होते, असे नाही. सध्यस्थितीत त्यांची सत्ता असती तर फारसा फरक पडला असता, असे वाटत नाही. इथून तिथून सगळे सारखेच असल्याने नागरिकांचे दुखणे दूर करण्यासाठी सध्याच्या राजकारणात कोणी मसिहा बनून मदतीला धावेल, असे कोणालाही वाटत नाही. ग्रामीण भागातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले होते. दूषित पाण्याचा प्रश्नही ग्रामीण भागात तसाच आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषदेही या साथीला कारणीभूत ठरते. त्यामुळे त्यांच्या मागणीला राजकीय रंग असल्याचेच स्पष्ट होत आहे. वसंतदादा आणि राजारामबापू पाटील यांच्यातील जुन्या संघर्षाला नवा आयाम देत जयंतरावांनी अनेकदा दादांच्या वारसदारांवर वार केले आहेत. या राजकीय हल्ल्यात जखमी झालेल्या वारसदारांचे खच्चीकरण करण्याची हीच नामी संधी असल्याचे हेरून जयंतरावांनी महापालिका बरखास्तीची मागणी केली.