बाजार समितीसाठी जयंतरावांची नजर घोरपडेंवर

By Admin | Updated: May 26, 2015 00:53 IST2015-05-25T23:42:33+5:302015-05-26T00:53:06+5:30

जूनमध्ये निवडणुका : मदनभाऊंना घेण्यास अजितराव घोरपडेंचा विरोध कायम

Jayantrao's look at the market committee for Gorpadenwar | बाजार समितीसाठी जयंतरावांची नजर घोरपडेंवर

बाजार समितीसाठी जयंतरावांची नजर घोरपडेंवर

अशोक डोंबाळे - सांगली -जिल्हा बँकेत निवडणुकीपासून दूर राहिलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बरोबर घेण्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी गळ टाकला आहे. परंतु, घोरपडे यांनी बाजार समिती निवडणुकीतही माजी मंत्री मदन पाटील यांना सोबत घेण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांची कोंडी झाली असून, घोरपडे की मदनभाऊ या कात्रीत ते सापडले आहेत.
सर्वाधिक मोठी आर्थिक उलाढाल असणारी संस्था म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत हे तीन तालुके बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येतात. मागील निवडणूक त्रिभाजनाच्या मुद्द्यावर झाली. मदन पाटील विरूध्द खासदार संजयकाका पाटील, अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप एकत्रित येत निवडणूक लढविली. संजयकाका, घोरपडे, जगतापांच्या पाठीशी जयंत पाटील यांचीच छुपी ताकद होती. घोरपडे, जगतापांनी त्रिभाजनाचे तोटे सभासदांपर्यंत पोहोचवित निवडणुकीत यश मिळविले होते. त्यानंतर तीनही नेते पाच वर्षे एकत्र होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा, विधानसभा निवडणुकाही लढविल्या. परंतु, विधानसभा निवडणुकीत घोरपडेंना यश मिळाले नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी मदन पाटील यांच्याशी युती करीत शेतकरी सहकारी पॅनेल तयार केले. घोरपडेंचा मदनभाऊंना विरोध असल्याने ते जयंतरावांच्या पॅनेलपासून दूर राहिले. यातूनच घोरपडे आणि दुष्काळी फोरमच्या अन्य नेत्यांमध्येही काही प्रमाणात दरी निर्माण झाली आहे. घोरपडेंची नाराजी बाजार समितीच्या निवडणुकीत अडचणीची ठरू शकते. म्हणूनच त्यांना सोबत घेण्याची तयारी जयंत पाटील यांनी चालविली आहे. त्यादृष्टीने त्यांच्याशी बोलणी सुरु झाली आहेत. पण, घोरपडे यांनी पूर्वीप्रमाणेच, मदनभाऊ असतील तर मी तुमच्याबरोबर नाही, असे सांगून, बाजार समितीच्या भल्यासाठी तीनही तालुक्यातील सभासदांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.
घोरपडेंची जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नाराजी दूर करून त्यांना बाजार समितीत बरोबर घेण्यासाठी दुष्काळी फोरमचे नेतेही प्रयत्न करीत आहेत. त्यादृष्टीने चर्चा चालू झाल्या आहेत. पण, घोरपडे यांच्या मनाला जिल्हा बँकेतील घडामोडी चांगल्याच बोचल्या आहेत. यातूनच त्यांनी दुष्काळी फोरमच्या नेत्यांपासून दुरावा घेतल्याचे दिसत आहे. खासदार संजयकाका पाटील यांचेही त्यांच्याशी फारसे सूत जमत नाही.
या पार्श्वभूमीवर बाजार समिती निवडणुकीत नक्की चित्र काय असणार, याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली आहे.


१८ जूनपासून निवडणुकीचा कार्यक्रम
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतदार यादी दि. ४ जूनरोजी निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १८ जूनपासून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित एक आणि भाजप व राष्ट्रवादी असे एकत्र येऊन एक पॅनेल होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मदनभाऊ भाजप, राष्ट्रवादीप्रणित पॅनेलकडे राहिल्यास अजितराव घोरपडे कोणती भूमिका घेणार, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.



जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्यापध्दतीने पॅनेल तयार केले होते, तशाच पध्दतीच्या लोकांना बरोबर घेऊन जयंत पाटील पॅनेल तयार करणार असतील, तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून वेगळा विचार करावा लागणार आहे. येत्या चार दिवसांत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. बाजार समिती शेतकऱ्यांची असून, ती त्यांच्यासाठीच राहिली पाहिजे, त्यादृष्टीने यापूर्वीही प्रयत्न केले. म्हणूनच जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांचा विकास झाला आहे.
- अजितराव घोरपडे, माजी मंत्री.

Web Title: Jayantrao's look at the market committee for Gorpadenwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.