लहान मुलांमध्येही जयंतरावांची क्रेझ..!
By Admin | Updated: February 15, 2015 23:45 IST2015-02-15T23:20:33+5:302015-02-15T23:45:50+5:30
‘लोकमत’ बाल मंच : कार्यक्रमात मुलांकडून शुभेच्छा

लहान मुलांमध्येही जयंतरावांची क्रेझ..!
अशोक पाटील -इस्लामपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेतून सहीसलामत बाहेर पडून आपला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात जयंत पाटील यशस्वी झाले. केंद्रात व राज्यात सत्ता बदलल्याने जयंत पाटील यांची जिल्ह्यावरील राजकीय पकड थोडी सैल झाली. तरीसुध्दा हिम्मत न हारता सर्वसामान्यांच्या सामाजिक उपक्रमात हजेरी लावण्याचा त्यांचा सपाटा कौतुकास्पद आहे. मंत्रीपद असो वा नसो, त्यांची मतदारसंघातील क्रेझ आजही टिकून आहे. त्यातच ते आता लहान मुलांचेही आयकॉन ठरत आहेत. नुकत्याच ‘लोकमत’च्या बालविकास मंच कार्यक्रमात मुलांनी त्यांना गराडा घालून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.सांगली महापालिका निवडणुकीनंतर जयंत पाटील यांच्या अस्तित्वाला धक्का बसतो की काय असाच राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. तो फोल ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा विजय त्यांच्या जिव्हारी लागला होता. विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात ते यशस्वी झाले असले तरी, शिराळा मतदारसंघ वाचवण्यात ते अपयशी ठरले. याची सल त्यांच्या मनात आहे. परंतु त्यांनी ते कधीही आपल्या चेहऱ्यावर जाणून दिले नाही. या पराभवाला जे जे कारणीभूत आहेत, त्यांना विविध कार्यक्रमांतून त्यांनी टोमणे मारले.सध्या मतदारसंघात विवाह समारंभांची रेलचेल आहे. या समारंभांना उपस्थित राहण्यासाठी त्यांची तळमळ साऱ्यांच्या नजरेत येते. जयंतराव आले तरच समारंभाची शोभा वाढते, अशाच भावना आजही कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. राज्यात आमचेच नेते नं. एकवर आहेत, अशीही भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात.
एकूणच राष्ट्रवादीची पिछेहाट झाली असली, तरी जयंत पाटील यांनी मात्र आपला करारी बाणा सोडला नाही. सलगपणे मतदारसंघाचा दौरा करून सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
वाळवा मतदारसंघाचा सलग दौरा
विधानसभा निवडणुकीत वाळवा मतदारसंघाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात जयंत पाटील यशस्वी झाले. राज्यात राष्ट्रवादीची पिछेहाट झाली असली, तरी त्यांनी मात्र आपला करारी बाणा सोडला नाही. सलगपणे मतदारसंघाचा दौरा करून गाठीभेटी, सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.