जवानाचा मृतदेह तब्बल २१ वर्षांनी सापडला!

By Admin | Updated: October 18, 2014 23:53 IST2014-10-18T23:53:16+5:302014-10-18T23:53:16+5:30

वडगावच्या पाटील कुटुंबाची व्यथा : सारे कुटुंबीय पुन्हा दु:खाच्या छायेखाली; सियाचीन बर्फात मृतदेह

Javana's body found after 21 years! | जवानाचा मृतदेह तब्बल २१ वर्षांनी सापडला!

जवानाचा मृतदेह तब्बल २१ वर्षांनी सापडला!

तासगाव : वडगाव (ता. तासगाव) येथील शहीद जवान तुकाराम विठोबा पाटील यांचा मृतदेह तब्बल २१ वर्षांनंतर सैन्यदलाला मिळाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाली आणि पाटील कुटुंबीय पुन्हा आठवणींच्या दु:खद छायेखाली लोटले गेले.
सियाचीनमधील ग्लेशियरच्या अतीउत्तुंग शिखरावरील बिल्ला पोस्टमध्ये २७ फेब्रुवारी १९९३ दुपारी २.१० वाजता ही दुर्घटना घडली होती. बर्फाच्या खोल दरीत हवालदार तुकाराम पाटील पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सैन्यदलाने प्रचंड मेहनत घेऊन स्वतंत्र तुकड्या मागवून दरीत ७० ते ७५ फूट उतरून तुकाराम पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु या प्रयत्नांना ना यश आले, ना पाटील यांचा ठावठिकाणा लागला. सैन्यदलाच्या प्रथेप्रमाणे पाटील यांचे साहित्य वडगावला पाठवून देण्यात आले होते. त्यांची पत्नी राजाक्का यांच्यासह सर्वच कुटुंबावर आभाळ कोसळले होते. वयाने अगदीच लहान असलेल्या दोन मुली व एक मुलगा, घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. परंतु परिस्थितीशी झगडत राजाक्का यांनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. मुलांना उच्चशिक्षित केले. मोठी रूपाली एम.सी.ए., धाकटी स्वाती एम.बी.ए. आहे. सर्वांत लहान प्रवीण अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. २१ वर्षे परिस्थितीशी संघर्ष करत न डगमगता राजाक्का यांनी जबाबदारी पार पाडली.
मात्र ज्या घटनेतून सावरून मुलांना घडवले, ती घटना २१ वर्षांनंतर पुन्हा अशा पध्दतीने सामोरी आल्याने राजाक्कांना धक्का बसला आहे. पाटील कुटुंब सध्या प्रचंड दु:खात आहे. लहानपणी काही कळतच नाही, अशा वयात पितृछत्र हरपलेल्या मुलांना आज कळत्या-सवरत्या वयात आठवणींनी आतून पोखरले आहे.
पाटील कुटुंबाचे तुकाराम यांचे वडील आणि दोन सख्खे भाऊही सैन्यदलातच होते. तुकारामपेक्षा धाकटे असलेले नारायण पाटील यांच्याबाबतीतही अशीच घटना सियाचीनमध्ये घडली. हा दुर्दैवी योगायोग! १४ फेब्रुवारी १९८७ रोजी नारायण पाटील असेच बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांचाही पत्ता लागला नाही. ते अविवाहित होते. त्या घटनेनंतर सहा वर्षांनी तुकाराम पाटील शहीद झाले. दुसरे बंधू ज्ञानदेव पाटील हे सेवानिवृत्त झाले आहेत. शहीद तुकाराम पाटील ६ मार्च १९७९ रोजी मुंबईतून सैन्यदलात भरती झाले होते. १९८५ ते ८६ मिझोराम, ८६ पासून नेफा येथे नियुक्तीस होते. त्यावेळी ‘आॅपरेशन बॅटल एक्स’ यामध्ये त्यांचा सहभाग होता. ९३ मध्ये सियाचीनला त्यांची नियुक्ती झाली होती. सैन्य सेवा पदक, उच्च तुंग पदकाने त्यांना गौरविण्यात आले होते. (वार्ताहर)
१९९३ ची शेवटची दिवाळी
१९९३ मध्ये तुकाराम पाटील दिवाळीत सुट्टी घेऊन गावी आले होते. मुलगा सहा महिन्यांचा होता. दिवाळीत तुळशी विवाहानंतर दुसऱ्यादिवशी ते नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले. मात्र परत आलेच नाहीत. ती दिवाळी त्यांची शेवटची ठरली. त्यावर २१ वर्षांनी त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली.
शहीद पाटील यांच्या निधनानंतर गावातील घाटशीळ येथे तुकाराम पाटील यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. दरवर्षी ग्रामस्थ त्यांची पुण्यतिथीही साजरी करतात.
तुकाराम पाटील यांच्या गळ्यात असणाऱ्या डिस्क ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. दि. १२ आॅक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह सैन्यदलाला मिळाला. ओळख पटल्यानंतर दि. १७ रोजी मेजर रामनाथसिंग यांनी पाटील कुटुंबियांना ही माहिती दिली. हे कळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पाटील कुटुंबीय दु:खाच्या छायेखाली आहे. वडगाव परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक त्यांना भेटून धीर देत आहेत.
सियाचीनच्या ग्लेशियरमध्ये काय घडले?
२७ फेबु्रवारी १९९३ रोजी दुपारपर्यंत शहीद तुकाराम पाटील पूर्णत: स्वस्थ होते. त्यांची नियुक्ती एका शिखरावर करण्यात आली होती. ते ३० जवानांच्या तुकडीसोबत हेलिकॉप्टरमधून टाकण्यात येत असलेली अन्नाची पाकिटे आणि इतर साहित्य गोळा करण्यासाठी गेले होते. त्या भागात बर्फाच्या दऱ्या होत्या. बर्फाने झाकल्या गेल्याने त्या दिसत नव्हत्या. दुपारी २.१० वाजता पाटील यांचा पाय अचानक दरीत घसरला. ती दरी खोल होती. दोरीच्या सहाय्याने ७० ते ७५ फुटापर्यंत जवान उतरले. त्यांनी जीव धोक्यात घालून प्रयत्न केले; पण पाटील यांचा ठावठिकाणा लागला नाही. बस कॅम्पमधून दोन हेलिकॉप्टर व खास बचाव पथक पाठवण्यात आले; परंतु त्यांच्याही प्रयत्नांना यश आले नाही.
 

Web Title: Javana's body found after 21 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.