खानापूर येथे उद्या जनसंकल्प बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:08+5:302021-02-05T07:27:08+5:30
विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र प्राधान्याने खानापूर येथेच व्हावे या मागणीला गती देण्यासाठी खानापूर येथे उद्या, शनिवारी खानापूर घाटमाथा ...

खानापूर येथे उद्या जनसंकल्प बैठक
विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र प्राधान्याने खानापूर येथेच व्हावे या मागणीला गती देण्यासाठी खानापूर येथे उद्या, शनिवारी खानापूर घाटमाथा व परिसरातील लोकांसाठी जनसंकल्प बैठकीचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिली.
ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याबाबत समिती नियुक्त केली होती. या समितीने खानापूर येथे जागेची पाहणी केली. त्यावेळी पाच ते सहा तालुक्यांचा हा मध्यवर्ती तालुका आहे व उपकेंद्रासाठी लागणारे सर्व निकष (महामार्ग, जमीन, पाझर तलाव पाणी) हे सर्व खानापूर येथे उपलब्ध असल्याने उपकेंद्र खानापूर येथेच उपकेंद्र होण्यास अनुकूलता दर्शविली होती.
परंतु, कालांतराने उपकेंद्राची मागणी मागे पडली व त्यात काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून खानापूर येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव किंवा सांगली येथे होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे खानापूरकरांवर अन्याय होत आहे. परिणामी, उपकेंद्र खानापूर येथेच होण्यासाठी घाटमाथ्यावर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी खानापूर येथे शनिवारी दुपारी चार वाजता जनसंकल्प बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व बळवंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी. एन. मुळीक मार्गदर्शन करणार असल्याचे गोपीनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.