इस्लामपुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: March 20, 2015 23:21 IST2015-03-20T22:48:48+5:302015-03-20T23:21:46+5:30
आरक्षणाची मागणी : मुंबईत विधानभवनाला घेराव घालण्याचा इशारा

इस्लामपुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा
इस्लामपूर : भारतीय राज्यघटनेने मुस्लिमांसाठी बहाल केलेले पाच टक्के आरक्षण येत्या सप्टेंबरपर्यंत न दिल्यास राज्यातील लाखो मुस्लिम बांधव विधानभवनाला घेराओ घालतील, असा इशारा देत, राज्यातील सत्तेवर असणाऱ्या भाजपने मुस्लिमांना वगळून विकास करून दाखवावा, असे जाहीर आव्हान वाळवा-शिराळा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी आज (शुक्रवारी) दिले.
येथील तहसील कार्यालयावर आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला. आझाद चौकातून हा मोठ्या जनसमुदायाचा मोर्चा बस स्थानकासमोरून तहसील कचेरीवर धडकला. तेथे मोर्चातील गर्दीमुळे सांगली-पेठ राज्य महामार्ग बंद झाला. त्यामुळे रास्ता रोकोचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिसांनी सतर्कता बाळगत वाहतूक वळवून गोंधळ टाळला.‘हिंदी है हम—हिंदोस्ता हमारा’ संघटनेचे संस्थापक हुमायून मुरसल यांनी, राज्यातील भाजप सरकार लबाड आहे. त्यांचा कारभार घटनाविरोधी आहे. त्यांना घटना मान्य नाही, अशा शब्दात हल्ला चढवत सरकारचे वाभाडे काढले. यावेळी प्रा. डॉ. सूरज चौगुले यांचेही भाषण झाले. जि. प. सदस्य सम्राट महाडिक, पालिकेतील नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव, काँग्रेसचे अॅड. आर. आर. पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख शकील सय्यद यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात सक्रिय राहू, असे सांगितले.अॅड. फिरोज मगदूम, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, रफीक किणीकर, मन्सूर वाठारकर, अॅड. फैज मुल्ला, रफीक तांबोळी यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार रूपाली सरनोबत यांना त्यांच्या कक्षात जाऊन निवेदन दिले. भारतीय जनता पक्षाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच त्यांनी मुस्लिमांचे आरक्षण रद्द केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मात्र शासनाने मुस्लिम समाजासाठीचा पाच टक्के आरक्षणाचा कोटा पुनर्स्थापित करुन चूक दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, शंकरराव चव्हाण, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, तालुका महिलाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर, कमल पाटील, काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, राजू सावकार, विजय पवार, नजीर वलांडकर यांच्यासह फूजल पटवेकर, मुनीर इबुशे, सलीम मुल्ला, शाकीर तांबोळी, राजू मोमीन, इम्रान फकीर, युनूस जमादार, समद मुल्ला, बबलू जाफर, नौशाद इबुशे, बरकतुल्ला सावकार, जावेद इबुशे, वाजीद खान व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
मुस्लिमांना वगळून विकास अशक्य
सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समिती, डॉ. महद्दुर्र रहमान समितीने मुस्लिम समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती दलित समाजापेक्षाही मागास आहे असे सांगत, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली होती. काँग्रेस—राष्ट्रवादीच्या सरकारने आरक्षणाचा कायदा करण्यात दिरंगाई केल्यामुळे समाजाला रस्त्यावर यावे लागल्याचीही टीका त्यांनी केली. ‘सबका साथ—सबका विकास’ अशी घोषणाबाजी करुन सत्तेवर आलेल्या भाजपने मुस्लिमांना वगळून विकास करुन दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. भारतीय जनता पक्षाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच त्यांनी मुस्लिमांचे आरक्षण रद्द केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.