मिरजेची पाणीयोजना गेली ११९ कोटींवर
By Admin | Updated: December 21, 2015 00:46 IST2015-12-20T22:57:52+5:302015-12-21T00:46:48+5:30
सुधारित योजना : ४५ कोटींची योजना तिपटीने वाढली, पुन्हा नवीन आराखडा तयार होणार

मिरजेची पाणीयोजना गेली ११९ कोटींवर
सदानंद औंधे -- मिरज शहरातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी ६५ वर्षे जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठा ताण आहे. मिरजेची सुधारित नळपाणी योजना रखडल्याने ४५ कोटींच्या या योजनेचा खर्च आता ११९ कोटींवर पोहोचला आहे. सुधारित नळपाणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे.
मिरज शहरासाठी १९५० मध्ये ५० हजार लोकसंख्येसाठी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. १९८५ मध्ये कालबाह्यझालेली जुनी यंत्रणा शहरातील सुमारे तीन लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरत आहे.
जुन्या योजनेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, वारंवार पाणीपुरवठा खंडित होणे असे प्रकार सुरु आहेत. मिरज शहरासाठी दररोज ३४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना केवळ २५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे.
मिरजेत २१ हजार नळ जोडण्या आहेत. मिरजेत दरमहा ४० लाख पाणी बिल आकारणी होते; मात्र सुधारित नळपाणी पुरवठा योजनेकडे महापालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. १९ वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळपाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. सुधारित योजनेला कर्जाऊ निधी मिळण्यासाठी योजनेचा आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र अनेक वर्षे नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली नसल्याने ४५ कोटींचा खर्च आता तिपटीवर गेला आहे.
म्हणूनच दुसरा टप्पा
२०४० पर्यंत मिरजेची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सुधारित नळपाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्याच्या सुजल योजनेतून नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुजल योजनेतून सुधारित नळपाणी पुरवठ्यासाठी महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून व कर्जाची तरतूद होती. मात्र केंद्र व राज्य शासनाने योजनेसाठी अर्थसहाय दिले नसल्याने मिरजेची सुधारित नळपाणीपुरवठा योजना बारगळली आहे. त्याऐवजी आता सुधारित नळपाणी पुरवठा टप्पा दोन योजनेचा ११९ कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.
सुधारित नळपाणी पुरवठा रखडल्याने तीन कोटी खर्चाची कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनी, अडीच कोटी खर्च करून जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली. भारतनगर, किल्ला भाग, इंदिरानगर, लेप्रसी कॉलनी, मगदूम मळा येथे पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या.
जुनी यंत्रणा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
मिरजेतील जलवाहिन्या जिर्ण व अपुऱ्या असल्याने वारंवार गळती होते. चार दिवसांपूर्वी जॅकवेलमधील व्हॉल्व्ह फुटल्याने तब्बल तीन दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले. जलवाहिन्यांच्या गळतीमुळे शहरातील अनेक भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. गतवर्षी दूषित पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरातील १९ जणांचा बळी गेला. शेकडोजणांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. मिरज शहर व विस्तारित भागातील शेकडो किलोमीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या जुन्या जलवाहिन्या अद्याप बदलण्यात आलेल्या नाहीत. सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेअभावी जुन्या पाणी पुरवठा यंत्रणेचा वापर सुरू आहे.
काय आहे नवीन योजनेमध्ये?
नवीन योजनेत समतानगर, वखार भाग, कुपवाड रोड येथे नवीन पाण्याच्या टाक्या व मुख्य जलवाहिन्यांचा (रायझिंग मेन) प्रस्ताव आहे. जीवन प्राधिकरण विभागाकडून योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, टप्पा दोन कार्यान्वित झाल्यास मिरज शहर व विस्तारित भागातील पाण्याची समस्या संपणार आहे. मात्र मिरजेच्या या नळपाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. शहराच्या विस्तारित भागात समतानगर ते कोल्हापूर रस्त्यापर्यंत अद्याप कोणतीही जलवाहिनी नसल्याने येथील हजारो नागरिक कूपनलिकेवर अवलंबून रहात आहेत.