सिंचन, पुनर्वसनाचे प्रश्न ‘जैसे थे’च
By Admin | Updated: May 1, 2015 00:19 IST2015-04-30T23:49:05+5:302015-05-01T00:19:36+5:30
पाणी योजनांसाठी साडेतीन हजार कोटींची गरज : भाजप सरकारकडून तुटपुंज्या निधीची तरतूद

सिंचन, पुनर्वसनाचे प्रश्न ‘जैसे थे’च
ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यातील कृष्णा खोरे प्रकल्पांचे तीन-तेरा वाजले आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनांची कामे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत पूर्ण झाली नाहीत. आघाडी सरकारनेही हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची ठोस तरतूद केली नाही. याच सरकारवर टीकेचा भडीमार करून सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने तर या योजनांना तुटपुंज्या निधीची तरतूद करून दुष्काळग्रस्तांच्या तोडाला पाने पुसली आहेत. यामुळे अपूर्ण सिंचन योजनांच्या खर्चाचा डोंगर वर्षाला शेकडो कोटींनी वाढत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान साडेतीन हजार कोटींची गरज आहे. ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याहस्ते झाला. मात्र २९ वर्षांनंतरही ही योजना अपूर्ण असून, दोन्ही योजनांवर आतापर्यंत १७०० कोटींचा निधी खर्च झाला. दोन्ही योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी दीड हजार कोटींच्या निधीची गरज आहे. ताकारी योजनेतून कडेगाव, तासगाव तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार एकर क्षेत्राला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी मिळत आहे. शेतकरीही पाणीपट्टी भरत असल्यामुळे योजना सुरळीत सुरू आहे. या योजनेचेही मुख्य व जोडकालव्याची २५ टक्के कामे अपूर्ण आहेत. येथील पोटकालव्याची कामे पूर्णत्वाला गेल्यास कडेगाव, तासगाव तालुक्यातील ५५ गावांमधील २४ हजार २९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. म्हैसाळ योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. निधीचे ग्रहण न सुटल्यामुळे ४० टक्के कामे अपूर्ण आहेत. आतापर्यंत ८९६ कोटींचा निधी खर्च झाला आहे. ओढ्या-नाल्यांनी पाणी सोडून १२०१० हेक्टर शेतीला पाणी मिळत असल्याचा अधिकाऱ्यांचा अहवाल आहे. राज्य शासनाने २०१५-१६ च्या अंदाजपत्रकामध्ये म्हैसाळ व ताकारी योजनेसाठी १५२ कोटींच्या निधी मागणी केली होती. त्यापैकी केवळ ८० कोटींचा निधी मिळाला आहे. या तुटपुंज्या निधीतून ठेकेदारांची थकबाकीही भागत नसल्यामुळे योजनांचे भवितव्य अडचणीत सापडले आहे. टेंभू योजनेसमोर तर समस्यांचा डोंगर आहे. या योजनेचा १४१६ कोटी ५९ लाखांचा खर्च ३४०० कोटींवर गेला आहे. १५०० कोटी खर्च झाल्यानंतरही ८० हजार ४७२ हेक्टरपैकी केवळ सात हजार हेक्टरपर्यंत पाणी पोहोचले आहे. तेही कऱ्हाड, कडेगाव, खानापूर तालुक्यातील काही भागालाच मिळते. अनेक संघर्षातून आटपाडी, सांगोला तालुक्यात पाणी मिळाले, पण ओढ्या-नाल्यांद्वारेच. मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाबरोबरच पोटकालव्यांची कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला तालुक्यातील बहुतांशी कामे अपूर्णच आहेत. येथील कामे पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना खऱ्याअर्थाने टेंभू योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणूनच प्रशासनाने २०१५-१६ यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये १८० कोटींच्या निधीची मागणी केली होती. परंतु, सरकारने केवळ ७८ कोटींच्या निधीची तरतूद करून दुष्काळग्रस्तांची निराशा केली आहे. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजना आणि वारणा डावा व उजव्या कालव्याबरोबरच आरफळ योजनांची कामे निधी नसल्याने अपूर्ण आहेत. - अशोक डोंबाळे