जयंत करंडक एकांकिका स्पर्धेत मानवी भाव-भावनांचा आविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:51+5:302021-02-16T04:28:51+5:30
इस्लामपूर : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इस्लामपूरच्यावतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ...

जयंत करंडक एकांकिका स्पर्धेत मानवी भाव-भावनांचा आविष्कार
इस्लामपूर : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा इस्लामपूरच्यावतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पहिल्या दिवशी नऊ एकांकिका पार पडल्या. साक्षी ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या स्थानिक कलाकारांनी सादर केलेले 'विस्कटलेले आम्ही' या एकांकिकेच्या माध्यमातून विविध स्तरांतून आणि विविध भागांतून आलेल्या सामान्य माणसांचं जीवन चित्रित करण्याचा प्रयत्न लेखकांनी केला. पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समान रूपात समोर येतो त्या वेळेला सर्व पुरुष जात एक होते. या मानवीवृत्तीला रंगमंचावर चित्रित करण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला.
'इमोशन्स बाय द वे' हेल्पिंग बडी फाउंडेशन सांगलीच्या संघाने भावनिक गुंतागुंत आणि त्याची सोडवणूक सुंदरपणे मांडली. परिवर्तन नाट्यसंस्था कोल्हापूरच्या माध्यमातून 'जंगल जंगल बटा चला’ या एकांकिकेने प्रेक्षकांची मने जिंकत सामाजिक संदेश दिला. वेगवेगळ्या रंगांमध्ये विभाजित होणारा मानव, धर्म -जात या माध्यमातून माणूसच माणसाचा दुश्मन बनत चाललेली समस्या परिवर्तनने मांडली. माय मराठी कला मंडळ पुणेच्यावतीने 'हमने घर छोडा है' यामध्ये तरुण मुलांच्या मनामधील भावना आणि परिवारातून त्यांना मिळणारे संस्कार याचा उलगडा करून दाखविला.
सक्षम ग्रुप इस्लामपूरच्या वतीने 'विवाह' ही एकांकिका सादर करण्यात आली. लग्नामध्ये मुलींची वाढणारी अपेक्षा, मुलांकडून मिळणारा प्रतिसाद आणि परिवारामध्ये येणाऱ्या विविध समस्या यांचा आढावा या एकांकिकेतून घेण्यात आला. नागदेवता ग्रुप इस्लामपूरच्या संघाने 'फुंकर' ही एकांकिका अतिशय प्रभावीपणे मांडली. समाजातील स्त्रियांची विवशता आणि त्यांच्या समस्येवर गंभीरपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या एकांकिकेतून झाला. प्रोसेस इन थिएटर आणि साई नाट्य धारा चंदगड यांच्यावतीने 'पॉज' या एकांकिकेमधून स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दलचा प्रश्न श्रोत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
चाैकट
विविध विषयांची मांडणी
दर्पण नाट्य संस्था सातारा यांच्या वतीने 'काठावरती' या एकांकिकेतून पारिवारिक समस्या आणि त्यामधून मानवी भावभावनांची गुंतागुंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न झाला. संवाद सातारा या संघाने 'पेनल्टी ऑफ फ्रेम' या एकांकिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध विषयांची मांडणी रंगमंचावर होताना दिसत आहे.
फोटो-