लॉकडाऊनमध्ये वाढली गुडघेदुखी??????????????????
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:09+5:302020-12-11T04:53:09+5:30
सांगली : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने खालावत असताना, अन्य आजारांची संख्या मात्र वाढत आहे. विशेषत: गुडघेदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण ...

लॉकडाऊनमध्ये वाढली गुडघेदुखी??????????????????
सांगली : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने खालावत असताना, अन्य आजारांची संख्या मात्र वाढत आहे. विशेषत: गुडघेदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे डॉक्टरांना आढळले आहे.
गेल्या ऑक्टोबरपासून सांगली-मिरजेतील अस्थिउपचार रुग्णालयांत अशा रुग्णांची वाढलेली संख्या डॉक्टरांच्यादृष्टीने चकित करणारी आहे. लॉकडाऊनच्या काळात सलग सात-आठ महिने नागरिकांनी घरात बसून काढले. फिरायला जाणे, व्यायाम करणे हा रोजचा परिक्रम बंद झाला. रस्त्यावर पोलीस आणि कोरोनाचा संसर्ग या दोहोंच्या भीतीने अंगणातही येता आले नाही. टीव्ही व संगणकासमोर बसून दिवस काढल्याने गुडघेदुखी बळावली.
अनेकांना पूर्वीपासूनच गुडघेदुखी सतावत होती, पण लॉकडाऊन काळात शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागल्या. त्यामुळेही गुडघेदुखी आणखी बळावली. वेदनाशामक गोळ्या व मलम वापरून रुग्णांनी कशीबशी कळ काढली. हे रुग्ण लॉकडाऊननंतर रुग्णालयात गर्दी करु लागले आहेत. शासकीय रुग्णालयात गर्दी होत आहे.
गुडघेदुखीची अशी घ्यावी काळजी...
अनियमित जीवनशैलीमुळे गुडघेदुखी बळावते, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. जास्त वेळ एकाच ठिकाणी मांडी घालून बसणे, सातत्याने जिने चढ-उतार करणे, आवाक्याबाहेरील ओझे उचलणे ही गुडघेदुखीची काही प्रमुख कारणे आहेत. वाढलेले वजन हेदेखील प्रमुख कारण आहे. वजन नियंत्रणात आणल्यास गुडघ्यांवर ताण पडत नाही. वयोमानानुसार हाडांची झीज झाल्यानेही गुडघे दुखतात. योग्य औषधोपचार आणि तज्ज्ञांकडून शस्त्रक्रिया हेच त्यावरील उपाय आहेत, अशी माहिती अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश शिंदे यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात मेडिकलमधून औषधे घेऊन लोकांनी वेदनांवर नियंत्रण मिळविले. सांधेदुखी, संसर्ग किंवा मार लागल्यानेही लोकांना गुडघेदुखीला तोंड द्यावे लागते. हे रुग्ण आता रुग्णालयात येताहेत. आठ महिने लॉकडाऊनमध्ये बसून काढल्याने पायांची हालचाल मंदावली. योग्य काळजी घेतल्यास चिंतेची वेळ येणार नाही.
- डॉ. गिरीश शिंदे, अस्थिरोगतज्ज्ञ
अंगावर काढण्याने आजार बळावले
कोरोनाने लॉकडाऊन आणले आणि लॉकडाऊनने बैठे रोग दिले, अशी काहीशी स्थिती आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाच्या भीतीने लोकांनी रुग्णालयात जाणे टाळले. अनेक आजार अंगावरच काढले. मेडिकलमधून गोळ्या घेऊन दिवस काढले. हे आजार नंतर बळावले. लॉकडाऊन संपताच रुग्णालयांत अशा रुग्णांची गर्दी होऊ लागली. सांगलीतील शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण संख्या दररोज हजारापर्यंत पोहोचली. त्यातील अनेकांचे आजार प्राथमिक उपचारांच्या पुढे गेले होते.
--------------