जिल्ह्यातील तेल पिकांच्या उत्पादनात २२९० हेक्टरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:51+5:302021-01-02T04:22:51+5:30

सांगली : जिल्ह्यात एकूण गळीत धान्य पिकाच्या पेरणीचे सरासरी ७८ हजार ६३ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी यावर्षी ७७ हजार ...

Increase in production of oil crops in the district by 2290 hectares | जिल्ह्यातील तेल पिकांच्या उत्पादनात २२९० हेक्टरने वाढ

जिल्ह्यातील तेल पिकांच्या उत्पादनात २२९० हेक्टरने वाढ

सांगली : जिल्ह्यात एकूण गळीत धान्य पिकाच्या पेरणीचे सरासरी ७८ हजार ६३ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी यावर्षी ७७ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. २०१९ च्या तुलनेत यावर्षी दोन हजार २९० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. पण, सोयाबीन, करडई, सूर्यफूल पेरणीचे क्षेत्र घटले आहे. भुईमुगाच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे पाणी दुष्काळी भागामध्ये फिरले आहे. यामुळे येथील गळीत धान्य पिकाची जागा ऊस, भाजीपाला आणि फळबागांनी घेतल्याचे आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील चित्र आहे. सोयाबीनची २०१९ मध्ये ४२ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झाल्यामुळे २०२० मध्ये सोयाबीनच्या पेरणीत ९०८ हेक्टरने घट झाली आहे. करडई, सूर्यफूल, तिळाच्या पेरणीत मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. करडईची दहा वर्षात नीचांकी २०० हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे. भुईमुगाचे क्षेत्र मात्र दुष्काळी भागासह सधन वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज पश्चिम भागामध्येही वाढले आहे. एकूण गळीत धान्याची पेरणी मात्र दोन हजार २९० हेक्टरने वाढली आहे. तेलाच्या मागणीत वाढ होत असताना सूर्यफूल, करडईचे क्षेत्र घटले आहे.

चौकट

करडई हद्दपार

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यामध्ये २००५ पर्यंत करडई पिकाची चार हजार हेक्टरपर्यंत पेरणी होत होती. कोरडवाहू जमिनीमध्ये करडईची पेरणी होत होती. कोरडवाहू जमिनीची जागा बागायत पिकाने घेतल्यामुळे करडई पेरण्याकडील शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. करडईची पेरणी सध्या केवळ भाजीपुरतीच होत आहे. सध्या केवळ दोनशे हेक्टरपर्यंतच पेरणी होत आहे. जत, आटपाडी तालुक्यातच ती होत आहे. औषधासाठीही करडई सापडत नाही, असे शेतकरी म्हणत आहेत.

कोट

वीस वर्षांपूर्वी शेतकरी करडई, सूर्यफुल, भुईमूग याचे एकत्रित घाण्यावर तेल काढून आणत होते. या तेलावरच आमची दिवाळी पूर्ण होऊन पुढे दोन महिने घरात त्याचा वापर होत होता. अत्यंत चविष्ट असेच ते तेल असायचे. सध्या ही परंपरा पूर्णत: नाहीशी झाली आहे. तेल बियाणांपासून तेल काढण्याचा व्यवसाय जवळपास बंद झाल्यामुळे पेरणीही कमी झाली आहे.

- सुरेश जगताप, शेतकरी.

कोट

सोयाबीनमध्ये २० टक्केच तेल असून ४२ टक्के प्रोटिन जास्त आहेत. तरीही सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. करडई, सूर्यफुलाची दुष्काळी भागामध्ये पेरणी होत होती. पण, गेल्या चार वर्षापासून शेतकरी करडई, सूर्यफुलाऐवजी भुईमूग, सोयाबीन पेरणीकडे वळला आहे.

- धनाजी पाटील,

जिल्हा कृषी अधिकारी, जि. प. सांगली.

Web Title: Increase in production of oil crops in the district by 2290 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.