बाजार समित्यांच्या दुर्लक्षाचा गुऱ्हाळांवर परिणाम
By Admin | Updated: November 25, 2015 00:31 IST2015-11-25T00:21:08+5:302015-11-25T00:31:46+5:30
शेतकरी संघटनांचेही दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे --गुऱ्हाळघरांना घरघर-३

बाजार समित्यांच्या दुर्लक्षाचा गुऱ्हाळांवर परिणाम
सहदेव खोत -पुनवत -गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य दर मिळवून देण्याकामी कृषी उत्पन्न बाजार समित्या, शासन व शेतकरी संघटना यांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरत आहे. बाजार समित्यांचा व्यापारी व अडते यांच्यावरील वचक कमी झाल्याने गूळ उत्पादकांची हानी होऊ लागली आहे. परिणामी दर मिळत नसल्याने शेतकरी गूळ निर्मितीपासून दूर जाऊ लागला आहे.
गूळ उद्योगाबाबतीत कोल्हापूर, कऱ्हाड येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या दुर्लक्ष करीत असल्याचे गुऱ्हाळमालक व उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. बाजार समित्यांच्या दुर्लक्षामुळेच व्यापारी व अडते यांच्याकडून पिळवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. प्रतिवर्षी उसाच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) दरासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकरी संघटना गूळदरासाठी फारशा आक्रमक होताना दिसत नाहीत. (समाप्त)
गुऱ्हाळांच्या ऱ्हासाला : मालकांची बेकी जबाबदार
गुऱ्हाळ उद्योगाच्या ऱ्हासाला गुऱ्हाळ मालकांची बेकी कारणीभूत ठरत आहे. गुऱ्हाळ मालकांच्या संघटना नाहीत. संघटना असतील तर समन्वय नाही. परिणामी अशा परिस्थितीत फक्त गूळ उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. गूळदरासाठी गुऱ्हाळमालकांनी ‘गुऱ्हाळघरे बंद’सारखे हत्यार उपसल्यास व्यापारी, अडते यांना चाप बसणार आहे.
गुऱ्हाळघरातून उच्च प्रतीचा गूळ बाजारपेठांत पाठविण्यासाठी प्रयत्न होतात. अनेकवेळा बारीक कणी, चांगला रंग, चांगली चव असूनही शेतकऱ्यांच्या गुळाला व्यापारी न्याय देत नाहीत. व्यापाऱ्यांनीच गुळाला दर देऊन हा उद्योग टिकविण्याची गरज आहे.
- दत्ता पाटसुते, कासेगाव,
गुळवे, नेर्ले, ता. शाहुवाडी.
गुळाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. घाणाभाडे, वाहतूक, हमाली, अडत, तोलाई, तोडणी वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. व्यापाऱ्यांनी गूळ उत्पादकांना न्याय दिला तरच शेतकरी गुऱ्हाळ उद्योगाकडे वळतील.
- बाबासाहेब वरेकर, गूळ उत्पादक, खवरेवाडी.