‘डॉल्बी’चे विसर्जन, बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना

By Admin | Updated: September 12, 2016 00:26 IST2016-09-12T00:26:38+5:302016-09-12T00:26:38+5:30

जिल्ह्यात मोहीम यशस्वी : पोलिस प्रमुखांचा पुढाकार; दणदणाटाशिवाय पार पडला पहिलाच गणेशोत्सव

Immersion of 'Dolby', Installation of Bondage | ‘डॉल्बी’चे विसर्जन, बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना

‘डॉल्बी’चे विसर्जन, बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना

सचिन लाड ल्ल सांगली
पोलिसांनी कागदावरील मोहीम प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केलेली धडपड अखेर यशस्वी झाली. गणरायाच्या प्रतिष्ठापनेबरोबरच डॉल्बीचे विसर्जन करून, सामाजिक सेवेचा भाग म्हणून जिल्ह्यातील अनेक मंडळांनी जलयुक्त शिवारातून बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना करण्याचा निर्धार केला. पारंपरिक वाद्यांना आलेले सुगीचे दिवस, दणदणाटाशिवाय पार पडणारा पहिलाच उत्सव, शांततेला मिळालेले निमंत्रण आणि कानठळ्या बसविणाऱ्या आवाजातून होणाऱ्या दुर्घटनांना मिळालेला ‘ब्रेक’, असे अनेक चांगले परिणाम या मोहिमेतून साकारले. त्यामुळे यंदाच्या उत्सवात क्रांतीची बीजे पेरून जिल्ह्यातील मंडळांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पुढाकार घेऊन ‘नो डॉल्बी’चा दिलेला नारा यशस्वी ठरला आहे. पोलिस प्रमुखांनी ‘नो डॉल्बी’वरच न थांबता, ‘डॉल्बी’साठी होणारा खर्च ‘जलयुक्त शिवार’कडे खेचण्यात यश मिळविले आहे. संपूर्ण गणेशोत्सव पहिल्यांदाच ‘डॉल्बी’च्या दणदणाटाशिवाय पार पडल्याने नागरिकांनी पोलिस प्रमुखांच्या या मोहिमेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.
दत्तात्रय शिंदे यांना जिल्हा पोलिसप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारुन अजून सहा महिनेही झालेले नाहीत. तरीही त्यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ‘नो डॉल्बी’ची मोहीम यशस्वी केली. शिंदे स्वत: रस्त्यावर उतरले. शहरासह तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी गणेश मंडळांच्या पदधिकाऱ्यांची बैठक घेऊन ‘डॉल्बी’ न लावण्याचे आवाहन केले. मंडळांनी एवढ्यावरच न थांबता ‘डॉल्बी’तून खर्च होणाऱ्या पैशाचा वापर विधायक कामासाठी करण्याचे आवाहन केले. यावर त्यांनी ‘जलयुक्त शिवार’चा प्रस्ताव मांडला. यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घेतली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘जलयुक्त शिवार’ला रोख, धनादेश व डिमांड ड्राफ्टद्वारे निधी दिला. या निधीतून दुष्काळी भागात पाच ते सहा चांगल्या दर्जाचे सिमेंट बंधारे बांधले जाणार आहेत. ‘गणराया’ ‘विघ्नहर्ता’ असे या बंधाऱ्यांना नाव दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील एक हजार ३६९ मंडळांनी यापुढे कधीही ‘डॉल्बी’ लावणार नाही, असा लेखी वचननामा दिला आहे. मिरज आणि आरग याठिकाणी ‘डॉल्बी’ आणून लावण्याचा झालेला प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. २५ लाखांचे ‘डॉल्बी’चे संच जप्त केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. गणेशाचे आगमन झाले. पाचव्या आणि सातव्यादिवशी विसर्जन मिरवणुका निघाल्या. पण कुठेही ‘डॉल्बी’चे दर्शन झाले नाही. बेंजो, बॅन्ड, लेझीम, झांजपथक व ढोल, ताशांचा गजर झाला. या पारंपरिक वाद्यांमुळे मिरवणुकीला रंगत तर आलीच; शिवाय ज्येष्ठांनी जुन्या काळातील आठवणींना उजाळाही दिला.

Web Title: Immersion of 'Dolby', Installation of Bondage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.