आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचा प्रेरणादायी इतिहास दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:27+5:302021-02-05T07:26:27+5:30
सावंतपूर : इंग्रजांशी सतत चौदा वर्षे प्राणपणाने लढा देणारे व स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हसतहसत फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे ...

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचा प्रेरणादायी इतिहास दुर्लक्षित
सावंतपूर : इंग्रजांशी सतत चौदा वर्षे प्राणपणाने लढा देणारे व स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हसतहसत फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा इतिहास तरुणांना प्रेरणादायी असूनही तो दुर्लक्षित राहिल्याची खंत प्रगतशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष मारुती शिरतोडे यांनी व्यक्त केली.
रामानंदनगर (ता. पलूस) येथे समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचार मंच, श्री समर्थ साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ व व्ही. वाय. (आबा) पाटील समाज प्रबोधन अकॅडमी यांच्यातर्फे आयोजित आचार्य शांतारामबापू गरुड स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना 'आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जीवन व कार्य' या विषयावर ते बोलत होते. ‘क्रांतिअग्रणी पर्व’चे संपादक व्ही. वाय. (आबा) पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. आदम पठाण यांनी स्वागत केले.
शिरतोडे म्हणाले. मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर स्वातंत्र्यलढा सुरू झाला. या स्वातंत्र्यलढ्याचे चार टप्पे पडतात. या चार टप्प्यांतील पहिल्या पर्वात उमाजी नाईक या रामोशी वीराने ब्रिटिशांच्या कंपनी सरकारला सळो की पळो करून सोडले. ब्रिटिश सैनिकांच्या पलटणी उमाजीला पकडण्यासाठी जिवाचे रान करीत होत्या परंतु डोंगरदऱ्यात लपून-छपून गनिमीकाव्याने इंग्रजांशी उमाजीने प्रखर बंड उभारले. उमाजी नाईकांच्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साडेतीन लाख हुतात्मे झाले आहेत. अनेकांनी कारावास भोगला आहे. बलिदान दिले आहे. त्यांच्या प्राण त्यागावरच आपल्या देशाचे स्वातंत्र्य आज उभे आहे. तेव्हा हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सजग राहिले पाहिजे.
व्याख्यानमालेस हिम्मतराव मलमे, दगडू जाधव, संदीप सदामते, सुनील दलवाई, भानुदास आंबी, उत्तम सदामते, मारुती सावंत, बाळासाहेब खेडकर, जयवंत मोहिते, संजय जाधव, महेश मदने, कृष्णत गायकवाड, संजीवनी मोहिते, म. मा. फाटक, बी. बी. खोत यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. प्रा. विठ्ठल सदामते यांनी आभार मानले.