शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरांना घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:50+5:302021-01-13T05:09:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : गुळाच्या दरात सातत्याने होणारी गळचेपी, मजुरांचा तुटवडा, भांडवलाची कमतरता, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शिराळा ...

शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरांना घरघर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : गुळाच्या दरात सातत्याने होणारी गळचेपी, मजुरांचा तुटवडा, भांडवलाची कमतरता, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरांना घरघर लागली आहे. तालुक्यात यावर्षी केवळ पाचच गुऱ्हाळघरे सुरू आहेत.
शिराळा तालुका गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी तालुक्यातील गुऱ्हाळघरांची संख्या शंभराच्या घरात होती. मात्र अलीकडच्या काही वर्षात ती वेगाने कमी होत सध्या केवळ पाचवर आली आहे. उद्योगातील तोट्यांमुळे शेतकरी व गुऱ्हाळमालकांनी या उद्योगाकडे पाठ फिरविली आहे.
छोटी उत्पादने व वैयक्तिक विक्री
बाजारपेठेत होणाऱ्या तोट्यामुळे अनेक उत्पादकांनी ३० किलोच्या रव्याऐवजी १०, पाच, एक किलोची उत्पादने घेऊन ती स्थानिक बाजारात तसेच गावोगावी विक्री करायला सुरुवात केली आहे. यामध्ये क्विंटलला चार हजाराचा दर मिळत आहे. मोठ्या बाजारपेठेत मात्र तोटा सहन करावा लागत आहे.
एकीकडे शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरविलेली असताना, काही गुऱ्हाळ मालकांनी शेतकऱ्यांचा ऊस वजनावर विकत घ्यायला सुरुवात केली असल्याने गुऱ्हाळघरांना थोडा तरी ऊस मिळत आहे. काही शेतकरी गुऱ्हाळमालकांना गळिताचे केवळ भाडे देऊन व्यापारी तत्त्वावर सामान्य व सेंद्रिय गुळाची निर्मिती करत आहेत. त्याच्या विक्रीतून अशा शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा चांगला दर मिळत आहे. तालुक्यातील शेकडो चाकरमानी रोजगारानिमित्त मुंबई, पुण्यामध्ये आहेत. अशा लोकांनी तालुक्यातील गूळ उद्योगाला गतवैभव मिळवून देण्यासाठी या गुळाला शहरात बाजारपेठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे.
चौकट -
सेंद्रिय गुळाचा प्रयोग
कापरी (ता. शिराळा) येथील प्रगतशील शेतकरी संदीप पाटील यांनी सेंद्रिय उसापासून पूर्ण सेंद्रिय गुळाची निर्मिती करून तो गूळ, काकवी, खडा, पावडर असा प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवून किफायतशीर व्यवसाय केला आहे.