‘हुतात्मा’चा उसाला राज्यात उच्चांकी दर
By Admin | Updated: June 25, 2014 01:04 IST2014-06-25T01:02:14+5:302014-06-25T01:04:20+5:30
वैभव नायकवडी : ७१ रुपयांचा दुसरा हप्ता

‘हुतात्मा’चा उसाला राज्यात उच्चांकी दर
वाळवा : येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याने २०१३-१४ च्या गळीत हंगामातील उसाला रुपये ७१ रुपयांचा दुसरा हप्ता आज, मंगळवारी जाहीर केला. राज्यात हा उच्चांकी दर असून, या बिलाचे चार कोटी ७४ लाख ७० हजार रुपये उद्या, बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत, असे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
नायकवडी म्हणाले की, यापूर्वी पहिला हप्ता एकरकमी रुपये २५०१ रुपयांचा दिला आहे. आता ७१ रुपये दिल्यानंतर एकूण २५७२ रुपये एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. २५७२ रुपये हा महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांत उच्चांकी दर आहे. हा अंतिम दर नसून अॅडव्हान्स बिल आहे.
यंदाचा गळीत हंगाम १५५ दिवस चालला. हंगामात कारखान्याने ६ लाख ६८ हजार ५९२ टन उसाचे गाळप करून ८ लाख ८५ हजार ८८० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १३.२५ टक्के आहे. शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची प्रथा प्रथमत: १९८३-८४ पासून ‘हुतात्मा’नेच सुरू केली आहे. ती अखंड ३० वर्षे जपलीही आहे.
यावेळी उपाध्यक्षा सौ. वंदना माने, कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, संचालक शंकर खोत (कदम), सुरेश होरे, बाळकृष्ण घारे, सुनील रकटे, सुनीता माळी, वित्त व्यवस्थापक सुकुमार शेटे उपस्थित होते. (वार्ताहर)