जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:31+5:302021-06-20T04:18:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, २१ जूनपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान ...

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, २१ जूनपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. चोवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद शिराळा तालुक्यात झाली आहे. सांगलीतील नदीपातळी अद्याप स्थिर असल्याने नदीकाठच्या नागरिकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे जूनच्या वीस दिवसात अनेक तालुक्यांत मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शुक्रवारी रात्रभर पुन्हा जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस कायम आहे. वारणा धरण क्षेत्रात शनिवारी सकाळी ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणातून सध्या १ हजार ६०५ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
चौकट
कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर
सांगलीतील आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदीची पातळी गेल्या चोवीस तासात स्थिर राहिली. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत येथील पाणीपातळी २० फूट इतकी होती. बहेजवळ ९, ताकारीत २३.११, भिलवडीत २३.३, अंकलीत २५.३ फूट पाणीपातळी नोंदली गेली.
चौकट
जिल्ह्यातील पाऊस मि. मी.
इस्लामपूर २०.९
पलूस १४.६
तासगाव ११.९
सांगली २२.८
शिराळा ३०.३
मिरज २४.६
विटा १८.८
आटपाडी ११.५
कवठेमहांकाळ २३
जत ८.३
कडेगाव २२.३
चौकट
दुष्काळी तालुक्यात यंदा जोरदार सुरुवात
मागील वर्षातील पावसाळ्यात १९ जूनपर्यंतची दुष्काळी तालुक्यातील एकूण आकडेवारी पाहिली तर यंदा जत, आटपाडी व कवठेमहांकाळ या तालुक्यांत पावसाची सुरुवात चांगली झाली आहे. विटा-खानापूरमध्ये मागील वर्षी १३० मि. मी. तर यंदा ६९.२, आटपाडीत मागील वर्षी ८० तर यंदा ७७.२, कवठेमहांकाळला मागील वर्षी १२२ तर यंदा १२८.२, जतला मागील वर्षी ५६ तर यंदा १४५.५ मि. मी. पाऊस नोंदला गेला आहे.
चौकट
धरणांच्या साठ्यात वाढ
आलमट्टीतून सध्या विसर्ग सुरु नाही. कोयनेतून २ हजार १००, वारणा धरणातून १ हजार ६०५ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कोयना धरणात ३६.३, वारणा धरणात ३४.४० टक्के इतका पाणीसाठा आहे.