सावधान, उष्णतेचा ‘पारा’ वाढत आहे...
By Admin | Updated: May 28, 2015 00:42 IST2015-05-28T00:42:09+5:302015-05-28T00:42:09+5:30
तापमानाची तपासणी : अभियांत्रिकी विद्यार्थी करत आहेत सेन्सर पद्धतीने अभ्यास

सावधान, उष्णतेचा ‘पारा’ वाढत आहे...
नरेंद्र रानडे -सांगली -मागील चार वर्षाच्या मे महिन्यातील तापमानाचा आढावा घेतल्यास, सांगली जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस कमी-अधिक प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी दुपारच्यावेळी नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या महिन्यात सांगलीचे सर्वाधिक कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे. तापमान मोजणाऱ्या उपकरणांचा अभ्यास करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेतील सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थी हवामान खात्याच्या कार्यालयास भेट देत आहेत.
वारणाली परिसरातील पाटबंधारे कार्यालय आवारात जलविज्ञान प्रकल्पाचा उपविभाग असून, त्याअंतर्गत असणाऱ्या हवामान खात्यात दररोजच्या तापमानाची नोंद घेतली जाते. सांगली जिल्ह्यात सांगलीव्यतिरिक्त म्हैसाळ (ता. मिरज), शिगाव (ता. वाळवा) आणि अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे हवामान केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे कवठेएकंद (ता. मिरज), रुकडी आणि पेठ-इस्लामपूर येथे तापमानाची नोंद करण्यासाठी सेन्सर पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.
तापमानाची प्रामुख्याने दोन पध्दतीने तपासणी करण्यात येते. यामध्ये सनशाईन रेकॉर्डर पध्दत महत्त्वाची आहे. थर्मामीटरसारख्या उपकरणाच्या साहाय्याने कमाल आणि किमान तापमान मोजण्यात येते. कमाल तापमान मोजण्यास पारा, तर किमान तापमान मोजण्यास अल्कोहोलचा वापर करण्यात येतो. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या कालावधीतील कमाल (जास्तीत जास्त) आणि किमान (कमीत कमी) तापमानाची नोंद हवामान खात्यात दररोज करण्यात येत आहे.
हवामान केंद्राच्या आवारात बाष्पीभवनपात्र असून त्याद्वारे उष्णतेमुळे किती पाण्याची वाफ झाली, याची नोंद करण्यात येत आहे. यंदा उन्हाळ्यात सरासरी चार ते साडेचार मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. यावरूनच विविध कालवे व धरणांतील बाष्पीभवन किती प्रमाणात होते, याचा अंदाज येतो.
मागील वर्षापेक्षा यंदा मात्र उष्णतेची तीव्रता अधिक असून, अजून काही दिवस तरी नागरिकांना उष्णतेचा त्रास होणार आहे.
उन्हाळ्यात पाऊस पडला तर हवामानात बदल होतो. परिणामी तापमानाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात जोरात वारे वाहत असतील तरी देखील तापमान कमी होते.
- एम. जी. मळवाडे,
सहायक अभियंता श्रेणी २ सांगली.
पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याने मागील चार वर्षाचा आढावा घेतल्यास, यंदा मे महिन्याच्या प्रारंभीच तापमानात वाढ झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात ४०.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले होते.
- एस. आर. पाटणे, उपविभागीय अभियंता, जलविज्ञान प्रकल्प
गेल्या तीन वर्षातील तापमान
दिनांक व वर्षकमाल तापमान दिनांक व वर्षकमाल तापमानदिनांक व वर्ष कमाल तापमान
२ मे २०१३३९२ मे २०१४३७,५२ मे २०१५३९
४ मे २०१३३७.५४ मे २०१४३७४ मे २०१५३९
११ मे २०१३३९.५११ मे २०१४३५११ मे २०१५३९
२४ मे २०१३३६२४ मे २०१४३९.५२४ मे २०१५३६