तासासाठी आले अन् बदनामी करून गेले!
By Admin | Updated: September 17, 2014 23:04 IST2014-09-17T23:02:24+5:302014-09-17T23:04:55+5:30
उपनिरीक्षकाची करामत : आटपाडी पोलिसात अस्वस्थता

तासासाठी आले अन् बदनामी करून गेले!
आटपाडी : कर्तव्यात कसूर, असभ्य वर्तन आणि सतत दारू पिऊन ड्युटीवर येणारे पोलीस उपनिरीक्षक हरी काळे यांना नुकतेच जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस आणि जनतेत योग्य तो संदेश गेला असला तरी, आटपाडी पोलिसांची मात्र पंचाईत झाली आहे. कारण एक तास आटपाडी पोलीस ठाण्यात आला आणि आटपाडी पोलीस ठाण्याची बदनामी करून गेला, अशी खंत पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
उपनिरीक्षक काळे यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. त्यानंतर त्यांची पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. ते नेहमी दारू पिऊन ड्युटीवर येत असत. दोन-तीन वेळा ताकीद देऊनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नव्हती. म्हणून दि. ४ जुलै रोजी त्यांची आटपाडी पोलीस ठाण्याकडे बदली करण्यात आली.
मात्र काळे आटपाडी पोलीस ठाण्यात हजर होताच पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी चांदोली धरणाच्या बंदोबस्तासाठी त्यांची रवानगी केली. त्यानंतर ते कधीही आटपाडी पोलीस ठाण्यात आले नाहीत. याची चर्चा कर्मचाऱ्यात सुरू होती. सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) जिल्हा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक काळे यांच्यावरील कारवाईची चर्चा झाली. त्यामध्ये अशा कर्मचाऱ्यांमुळे आटपाडी पोलिसांची नाहक बदनामी होत आहे. अशी खंत कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
आटपाडी म्हणजे शिक्षा नव्हे...
कोणत्याही विभागातील वादग्रस्त कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून आटपाडीला पाठविण्यात येते. पण या बहाद्दरांमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्यांच्या परिस्थितीतच आणखी सुधारणा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. याचे कारण म्हणजे आटपाडीतल्या सगळ्याच विभागांच्या कार्यालयांमध्ये अशा वादग्रस्त कर्मचाऱ्यांचेच बहुमत होत असल्याने, एकमेकांच्या युक्त्यांची देवाण-घेवाण करून ही मंडळी स्वत:मध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्था बिघडवत आहेत. त्यामुळेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला जिल्ह्यात सर्वाधिक यश आटपाडीतील सापळ्यांना मिळत आहे.