...तर आयुक्त, पदाधिकाऱ्यांचे हात-पाय बांधण्यात येतील
By Admin | Updated: September 13, 2016 00:51 IST2016-09-12T23:56:18+5:302016-09-13T00:51:02+5:30
बच्चू कडू : सांगलीत सुधार समिती कार्यालयाचे उद्घाटन

...तर आयुक्त, पदाधिकाऱ्यांचे हात-पाय बांधण्यात येतील
सांगली : देशातील लोकप्रतिनिधींना राजकीय पक्षाचा झेंडा महत्त्वाचा वाटतो आहे. त्यांना नागरी सुविधांसाठी तडफडणारी जनता दिसत नाही. लोकशाहीला लागलेली ही कीड नाहीशी करण्यासाठी जनतेनेच संघटित झाले पाहिजे, असे मत व्यक्त करीत, राज्यातील महापालिकांनी अपंगांसाठीचा निधी खर्च न केल्यास आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांचे हात-पाय बांधू, असा इशारा अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी सांगलीत दिला.
सांगली जिल्हा सुधार समिती कार्यालयाचे उद्घाटन बच्चू कडू यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अॅड. के. डी. शिंदे, समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, मुनीर मुल्ला, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गायकवाड उपस्थित होते .
यावेळी आमदार कडू म्हणाले की, मंत्रालयातील अधिकारी मुजोर झाले आहेत. सामान्य नागरिक, शेतकऱ्यांची कामे होत नाहीत. याचे कारण लोकशाहीला कीड लागली आहे. जातीच्या नावावर मते घेऊन राजकारण सुरू आहे. मंत्रालयात अनेक सचिव, मंत्री आहेत. तरीही सामान्य माणसांचे प्रश्न सुटत नाहीत. आम्ही विधानसभेत कायदे करून ते पाळण्याचा प्रयत्न करतो. याउलट अधिकारी कायदेच पाळत नाहीत. सुधार समिती अशा मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम करते आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. अच्छे दिन दिल्लीतून नव्हे, तर गल्ली-गल्लीतून येणार आहेत. यासाठी जनतेनेच संघटित झाले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्याध्यक्ष शिंंदे म्हणाले की, भ्रष्ट राजकारण्यांनी सांगलीची वाट लावली. असंख्य महाविद्यालये, रुग्णालये आहेत, पण सुविधांसाठी लढावे लागते. भ्रष्ट नगरसेवकांनी सांगलीची ओळखच पुसली आहे. महापौर हे महासभेत शड्डू ठोकतात. महासभेत मटकेवाले, दारुवाले, अतिक्रमण करणारे लोकप्रतिनिधी असतात. सत्तेतील एक गट विरोधात काम करतो आहे. विरोधक म्हणून या सदस्यांना चाड असेल, तर पदाचे राजीनामे देऊन त्यांनी मैदानात उतरावे. सांगलीकरांना मूर्ख बनविण्याचा उद्योग बंद करावा. मुरुम टाकण्याची स्टंटबाजी बंद करावी, अशी टीकेची झोड त्यांनी उठविली. (प्रतिनिधी)
हे कसले ब्रॅन्डिंग ?
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगली ब्रँडिंगचा बोलबाला सुरू केला आहे. पण हे कसले ब्रॅँडिंग? जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळाने त्रस्त आहेत. सांगली शहरात रस्त्यांच्या खड्ड्यांनी कंबरडे मोडले आहे. व्यापार, उद्योग संपला आहे. पुढील दोन वर्षात या अधिकाऱ्यांना कारभार सुधारण्यासाठी सुधार समिती भाग पाडेल. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी महापालिकेचा बिग बाजार केला, तर काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी अक्षरश: आठवडा बाजार केला. जयंतरावांनी सांगलीकरांना मोनोरेल नावाची कॅडबरी दाखवली, तर शुध्द पाण्याचे चॉकलेट दाखवले, अशा शब्दात अॅड. अमित शिंंदे यांनी जयंत पाटील व सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली.