हमाल, तोलाईदारांचा सांगलीत मोर्चा
By Admin | Updated: December 19, 2014 23:52 IST2014-12-19T23:43:53+5:302014-12-19T23:52:31+5:30
बाजार समितीला निवेदन : तोलाई मजुरी देण्याची मागणी

हमाल, तोलाईदारांचा सांगलीत मोर्चा
सांगली : इलेक्ट्रॉनिक वजन-काट्यावर शेतीमालाचे वजन केल्यास त्यास तोलाई मजुरी आकारू नये, असा पणन महामंडळाचा आदेश सर्व बाजार समित्यांना आला आहे. याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) हमाल तोलाईदारांच्यावतीने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, विकास मगदूम यांनी केले.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडे इलेक्ट्रॉनिक वजन-काटे ताबडतोब बसवावेत आणि वजन-काट्यावर वजन केलेल्या शेतीमालाची तोलाई कपात करण्यात येऊ नये, असे आदेश पणन खात्याने काढले आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये विविध घटकांत चर्चा सुरु असून तोलणाऱ्या घटकांत अस्वस्थता व असंतोष आहे. हा निर्णय घेण्याआधी आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करणे आवश्यक होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात गेल्या चार वर्षांपासून शंभर टक्के इलेक्ट्रॉनिक काट्यावरच शेतीमालाचे वजन केले जात असून, तोलाई मजुरी दिली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांची तक्रार नाही. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊनच बाजार समिती तोलाई मजुरी ठरवत आहे. आता नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार असून, तोलाईदार, हमाल यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोर्चाची सुरुवात हमाल पंचायत कार्यालयापासून करण्यात आली. यावेळी शासनाच्या नव्या आदेशाची होळी करण्यात आली. आंदोलनामध्ये बाळासाहेब बंडगर, अॅड. के. डी. शिंदे, बजरंग मोहिते, श्रीकांत पुस्तके, यशवंत पवार, वसंत सूर्यवंशी, यशवंत सावंत, गोविंद सावंत आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)