इस्लामपुरात गणेश आरतीतही गट-तट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 00:02 IST2015-09-23T22:10:57+5:302015-09-24T00:02:41+5:30
शहरासह परिसरातील गणेश मंडळांनी महाप्रसाद आणि देखाव्यावर पैसे खर्च न करता आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

इस्लामपुरात गणेश आरतीतही गट-तट
अशोक पाटील -इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गटाच्या युवा नेत्यांना आरतीचा मान दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना मंडळाच्या गणेशाच्या आरतीला आणण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने का होईना, ते युवकांचे आयडॉल बनले आहेत. त्यांनी मंगळवारी तब्बल ६0 मंडळांच्या गणेशाची आरती केली. राज्यातील दुष्काळाचे सावट वाळवा तालुक्यावरही दिसू लागले आहे. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. गणेशमूर्तींची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने मूर्तीकारांना शेवटच्या टप्प्यात किमती कमी करून गणेशमूर्तींची विक्री करावी लागली. शहरासह परिसरातील गणेश मंडळांनी महाप्रसाद आणि देखाव्यावर पैसे खर्च न करता आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बहुतांशी मंडळांना जयंत पाटील यांच्यासह प्रत्येक गटाच्या नेत्यांनी मदत केली आहे. त्यामुळे त्या-त्या गटाच्या नेत्यांना आरतीसाठी आमंत्रित केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट महाडिक, जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, माजी आ. विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव व विशाल शिंदे, शिराळा तालुक्यातून माजी आ. मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईक, आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांना आरतीसाठी मोठी मागणी आहे.
इस्लामपूर शहरातील नगरसेवक संजय कोरे, कपिल ओसवाल, शहाजी पाटील, माजी नगरसेवक शिवाजी पवार, विक्रम पाटील, संजय पाटील, राजवर्धन अशोक पाटील यांना, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आरतीला येण्यासाठी आग्रह केला जात आहे.
राजकीय वारसदार कोण?
आ. जयंत पाटील व त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रतीक पाटील यांनी मंगळवारी रात्री इस्लामपूर शहरातील ६0 गणेश मंडळांच्या आरतीस हजेरी लावली़ मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या दोघा पिता-पुत्रांचे जल्लोषात स्वागत केले. पाटील यांनी दोन्ही मुलांना राजकारणापासून दूर ठेवले आहे. सामाजिक कार्यक्रमात ते दोघांनाही सोबत घेऊन वावरत आहेत. त्यामुळे राजवर्धन व प्रतीक राजकारणात सक्रिय होणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.