कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्यपालांनी लक्ष घालावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:30+5:302021-05-01T04:24:30+5:30
मुंबईत येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी निवेदन दिले. यावेळी स्वरूपराव ...

कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्यपालांनी लक्ष घालावे
मुंबईत येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी निवेदन दिले. यावेळी स्वरूपराव पाटील, सुजित थोरात उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्यपालांनी लक्ष घालावे यासाठी भारतीय जनता युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथील राजभवनमध्ये जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राहुल महाडिक यांनी राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले.
राज्यामध्ये गेले अनेक दिवस कोरोनाने थैमान घातले आहे, अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत, अशी परिस्थिती उद्भवत असताना सरकार प्रशासकीयदृष्ट्या पूर्णपणे अपयशी ठरत आहे. राज्यात हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजन प्लांटमध्ये अपघात होत आहेत, यावेळी लोक गुदमरून मरत होते, पण यंत्रणा त्यांना वाचवायला हतबल असल्याचे दिसून आले.
राज्यातील सामान्य जनतेला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे, एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे लॉकडाऊन, काही लोक उपासमारीने मरत आहेत तर काही कोरोनाच्या महामारीमुळे मरत आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी, छोटे-छोटे व्यापारी, बाराबलुतेदार कामगार देशोधडीला लागण्याचे चिन्ह आहेत. मोठ्या व्यापाऱ्यांनी उद्योग बंद ठेवल्याने कामगारांचे हाल सुरू आहेत,
अशा परिस्थितीत महावितरण कंपनी वीज बिलाची वसुली सक्तीने करीत आहेत, हे तत्काळ थांबणे गरजेचे आहे, तरी राज्यपालांनी यात स्वत: लक्ष घालून ही विस्कटलेली यंत्रणा सुस्थितीत करावी, अशी मागणी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते स्वरूपराव पाटील, इस्लामपूरच्या महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात उपस्थित होते.