गुंड म्हमद्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक
By Admin | Updated: December 21, 2015 00:54 IST2015-12-20T22:56:14+5:302015-12-21T00:54:38+5:30
कारागृहातून ताबा : सोमवारी न्यायालयात हजर करणार; आश्रयदात्यांचा शोध सुरूच--मनोज माने खून प्रकरण

गुंड म्हमद्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक
सांगली : खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित व पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गुंड महंमद ऊर्फ म्हमद्या जमाल नदाफ (वय ३५, रा. अभयनगर, साई मंदिरजवळ, संजयनगर, सांगली) यास अखेर शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आर्थिक वाद व खंडणीचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने म्हमद्या नदाफ व त्याचे साथीदार सागर शेंडगे, कमर मुजावर यांनी मनोजचा धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केला होता. या खुनानंतर म्हमद्या रातोरात गायब झाला. तब्बल एक महिन्यानंतर त्याला बेडकीहाळ (ता. चिकोडी) येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. प्रथम त्यास खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तब्बल दहा दिवस त्याला पोलीस कोठडी मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. सांगली कारागृहात म्हमद्याचे विरोधक असल्याने सुरक्षेच्या कारणावस्तव त्याला कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलविण्यात आले होते.मनोजचा खून केल्याप्रकरणी म्हमद्याला अटक करायची असल्याने पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने शनिवारी दुपारी परवानगी दिली होती. त्यानंतर संजयनगर पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात रवाना झाले होते. रात्री उशिरा त्याचा ताबा मिळाला. मध्यरात्री त्याला घेऊन पथक सांगलीत दाखल झाले. रविवारी सकाळी त्याला न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे चौकशीची सूत्रे आहेत. त्याची कसून चौकशी सुरू आहे. मनोजचा खून का केला? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? हत्यारांची जुळवाजुळव कोठून केली? खुनाचा कट कधी आणि कोठे शिजला? खून केल्यानंतर तो कुठे-कुठे आश्रयाला गेला? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांना आता मिळणार आहेत. त्याने दोनमजली घराचे बांधकाम सुरू केले होते. यासाठी त्याने पैशाची कोठून जुळणी केली? खंडणीच्या पैशातून त्याने घर बांधले आहे का? याचीही माहिती घेतली जाणार आहे. बेडकीहाळ येथे तो भाड्याने खोली घेऊन राहत होता. पण तिथे त्याला खोली घेऊन कोणी दिली, याचाही तपास केला जाणार आहे. अटकेत असलेल्या साथीदारांनाही पुन्हा ताब्यात घेऊन त्यांची म्हमद्यासमोर चौकशी केली जाणार आहे. चौकशीत तफावत आढळून येते का? याची माहिती घेतली जाणार आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षात म्हमद्याच्या सातत्याने गुन्हेगारी कारवाया सुरुच राहिल्या आहेत. केवळ खुनीहल्ल्याच्या गुन्ह्यातच त्याला शिक्षा झाली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे नियोजन सुरु आहे. यासाठी त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरु झाले आहे. (प्रतिनिधी)
आश्रयदाते गायब : दोन महिन्यांपासून तपास
म्हमद्या खून करुन गायब झाल्यानंतर त्याला आश्रय देणाऱ्या अकराजणांना आतापर्यंत अटक केली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून याचा तपास सुरू आहे. तरीही पोलिसांच्या तपासात आश्रयदात्यांची नावे निष्पन्न होतच आहेत. सध्या पाच आश्रयदाते रडारवर आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. पण म्हमद्या सापडल्यानंतर त्यांनी शहरातून पलायन केले आहे.