गिरजवडे प्रकल्प ठरणार शेतीला वरदान
By Admin | Updated: August 31, 2014 23:35 IST2014-08-31T22:49:26+5:302014-08-31T23:35:32+5:30
नागरिकांत समाधान : शिराळा तालुक्यातील ३५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

गिरजवडे प्रकल्प ठरणार शेतीला वरदान
शिराळा : गिरजवडे लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. ३५० हेक्टर शेतीचे क्षेत्र पाण्याखाली येऊन शेती हिरवीगार होणार आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेसह अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या गिरजवडे प्रकल्पाची उभारणी सत्यात उतरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शिराळा तालुक्याचा उत्तर भाग पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे येथील बहुतांशी मंडळी नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबई आदी शहरात आहेत. उन्हाळ्यात होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई संपावी, पाण्याविना वाळणारी पिके कायम हिरवीगार दिसावीत, येथील शेती व शेतकरी समृद्ध व्हावा, कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचवावा यादृष्टीने येथे पाणी येणे महत्त्वाचे होते. वाकुर्डे योजनेस निधी मिळाल्याने वारणेचे पाणी उत्तर भागात आले. वाकुर्डे ते रेड व बादेवाडी ते बिऊर कालव्याची कामे झाली. हात्तेगाव व खिरवडे पंपहाऊस कार्यान्वित करून वारणेचे पाणी वाकुर्डेच्या करमजाई तलावात आले. आज या पाण्याचा लाभ वाकुर्डे ते मांगलेपर्यंतच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकरी घेत आहेत.
वाकुर्डे योजनेशिवाय उत्तर भागातील गिरजवडे व परिसरातील अनेक गावांना वरदान ठरणारा गिरजवडे लघु पाटबंधारे प्रकल्प या भागातील महत्त्वाचा प्रश्न होता. अनेक वर्षांपासून रखडलेल्या गिरजवडे प्रकल्पाची उभारणीसाठी २२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रारंभाचा कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता गिरजवडे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीस सुरुवातही झाली आहे.
गिरजवडे प्रकल्पाखाली ६.३२ चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र आहे. एकूण लांबी ६७५ मीटर, तर उंची २६.८५ मीटर आहे. १०८.५८ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होणार आहे. लाभक्षेत्रातील गावात ३५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. अनेक विहिरींना पाण्याचा उद्भव निर्माण होणार आहे. भविष्यात या भागात कारखाने, उद्योगांची उभारणी झाल्यास त्यांना पाणी देता यावे, यासाठी ३०७.५० सहस्र घनमीटर पाण्याची तरतूद आहे. (वार्ताहर)