‘क्रांती’चे घाेगाव गट कार्यालय पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST2021-01-08T05:27:47+5:302021-01-08T05:27:47+5:30
अपवादवगळता जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. वेळेत एफआरपी ...

‘क्रांती’चे घाेगाव गट कार्यालय पेटविले
अपवादवगळता जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. वेळेत एफआरपी न दिल्याच्या निषेधार्थ क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले. हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा घडला. आगीत कार्यालयातील कागदपत्रे व फर्निचर जळाले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी एकरकमी एफआरपी द्यायचे कबूल केले होते. मात्र, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी ‘शब्द’ पाळला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी, असा आग्रह धरला होता. यासाठी जिल्ह्यात आंदोलनेही झाली. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केल्यानंतर हंगामाला सुरुवात झाली. मात्र, हंगाम सुरू होऊन अडीच-तीन महिने उलटले तरी, अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांना इशारा दिला होता. त्यानंतरही अपवादवगळता इतर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. वेळेत एफआरपी मिळत नसल्याने अखेर संघटनेने कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. येणाऱ्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.