अनिष्ट रुढींच्या ‘जटां’मधून विद्यार्थ्याची मुक्तता
By Admin | Updated: September 19, 2015 23:57 IST2015-09-19T23:57:26+5:302015-09-19T23:57:59+5:30
मुलाच्या भवितव्यासाठी पोतराजांचा परंपरेला छेद : शिक्षक, अधिकारी, ‘अंनिस’चा पुढाकार

अनिष्ट रुढींच्या ‘जटां’मधून विद्यार्थ्याची मुक्तता
दत्ता पाटील / तासगाव
वर्षानुवर्षे मनात घर करून बसलेल्या अनिष्ट रुढींचं गाठोडं डोक्यावरून सहजासहजी उतरलं जाऊ शकत नाही. तरीही चिंचणी (ता. तासगाव) येथील अशाच एका मरिआईच्या पोतराजाने आपल्या मुलाला परंपरेची चाकोरी सोडून शाळेत घातले. शाळेत गेल्यानंतरही डोईवरच्या जटांनी त्याची थट्टा सुरू झाली. शाळेतील शिक्षक, विस्तार अधिकारी आणि अंनिसच्या प्रबोधनाला प्रतिसाद देत तब्बल तेरा वर्षानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जटांमधून मुक्ती दिली.
तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे महावीर पवारांच्या अनेक पिढ्या मरिआईची सेवा करणारे पोतराज म्हणून गेल्या. पवारांच्या पिढीत पोतराजाचे काम थांबले. बदलणाऱ्या दिवसांबरोबरच महावीर पवार या पोतराजाने आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार करुन आपल्या मुलांना शाळेत दाखल केले. प्रतीक हा त्यांचा मुलगा चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर एकमध्ये सातवीच्या वर्गात यावर्षी शिक्षण घेत आहे. प्रतीक १३ वर्षांचा झाला, मात्र पोतराजांच्या प्रथेनुसार प्रतीकच्या डोक्यावरचे केस कापण्यात आले नव्हते. तिसरीत आल्यानंतर केस लांबल्यामुळे केसांचा बुचडा बांधूनच तो शाळेत येऊ लागला. इतर मुलांपेक्षा असलेला त्याचा वेगळेपणा, मुलींसारखे वाढलेले केस आणि बुचडा, यामुळे प्रतीक वर्गमित्रांच्या थट्टेचा विषय बनला. तिसरीपासून ते सातवीपर्यंतचा त्याच्या शाळेचा प्रवास असाच सुरू होता. सुरुवातीला थट्टेने लाजीरवाणा होणारा प्रतीक नंतर चिडचिडा झाला. चिडविणाऱ्या मुलांबरोबर त्याचे खटके उडायला लागले.
शाळेतील अभ्यासावरही त्याचा परिणाम झाला. प्रतीकमध्ये दिवसेंदिवस होत असलेला बदल आणि त्याच्या कारणांचा शोध त्याच्या वर्गशिक्षिका शोभा माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. प्रतीकच्या डोक्यावरील अनिष्ट रितींचा बुचडाच या गोष्टींना कारणीभूत ठरत असल्याची बाब शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिली.
कांबळे यांनी यावर तोडगा काढण्याचा निश्चय केला. अंनिसचे कार्यकर्ते भास्कर सदाकळे आणि अन्य सहकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. प्रतीकच्या कुटुंबातील वडिलांसह इतरांना प्रतीकच्या मनात सुरू असलेली घालमेल आणि त्याच्या भवितव्याबाबत चर्चा केली. वडिलांना त्यांचा सल्ला पटला. मुलाच्या भवितव्याला महत्त्व देत त्यांनी वर्षानुवर्षे प्रतीकच्या डोक्यावर असलेल्या केसांच्या बुचड्याबरोबरच अनिष्ट रूढींच्या जटांचेच निर्मूलन करून एक नवा पायंडा घातला. यासाठी शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाजजागृतीसाठी केलेल्या उपक्रमाचे विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनीही कौतुक केले.
असा झाला बदल
डोक्यावर असलेल्या केसांच्या बुचड्यामुळे प्रतीक मुलांच्या थट्टेचा विषय बनला होता. वर्गमित्रांच्या चिडवण्यामुळे तो वर्गात नेहमी एकाकी असायचा. शिक्षक वर्गाबाहेर गेले की जटांवरून त्याचे सातत्याने भांडण सुरू व्हायचे. मात्र जटांच्या निर्मूलनानंतर शाळेत येताना आनंदी तर असतोच; मात्र नेहमीचा चिडचिडा स्वभावही नाहीसा झाला आहे. आता तर तो सर्व वर्गमित्रांच्यात मिळून मिसळून असतो. इतकेच नाही, तर त्याचे अभ्यासावरही लक्ष केंद्रीत झाले असल्याचे शिक्षिका शोभा माने यांनी सांगितले.
मरिआई आमचे दैवत आहे. अनेक पिढ्यांनी पोतराज म्हणून मरिआईची सेवा केली. आमच्या पिढीने नवा व्यवसाय सुरू केला. मात्र घरातील पहिल्या मुलाला मरिआईचा पोतराज म्हणून त्याचे केस न कापता त्याला पोतराज म्हणून सोडायची प्रथा होती. म्हणूनच प्रतीकचे केस कापले नाहीत. मात्र यापुढे आम्ही अनिष्ट प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
- महावीर पवार (प्रतीकचे वडील)